कोल्हापूर / प्रतिनिधी :
पत्रकार आपल्या लेखणीतून परखड व स्पष्टपणे मते मांडत असतात. त्यांच्यातील हा परखडपणा पाहूनच आपल्यालाही स्पष्ट आणि परखडपणे बोलायची सवय लागते , त्यामुळे जे जे चुकले त्यांचा समाचार घ्यायला आम्ही मागेपुढे पाहिले नाही. शहरी पत्रकारांइतकेच ग्रामीण पत्रकारही जनतेला भेडसावणाऱ्या समस्या तितक्याच ताकदीने मांडत असतात असे प्रतिपादन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केले. करवीर तालुका पत्रकार संघाच्या वतीने आयोजित पत्रकार पुरस्कार सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष उद्योगपती व्ही.बी.पाटील होते .
यावेळी उद्योजक रामचंद्र भोगम यांच्याकडून आकर्षक भेटवस्तू व ऍड.सी.बी.कोरे यांच्याकडून सर्व पत्रकारांना विमापत्र वाटप करण्यात आले. पाहुण्यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार डॉ. सुभाष देसाई यांना जीवन गौरव तर करवीर तालुक्यातील तरुण भारतचे पत्रकार गजानन लव्हटे,एम.टी. शेलार, शिवराज लोंढे, निलेश जाधव, प्रकाश नलवडे व बाजीराव तळेकर यांना करवीर भूषण पत्रकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व्ही.बी.पाटील म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील कुस्तीला उर्जितावस्था आणण्यासाठीचे सुरू केले आहेत. पैलवानांसाठी सुसज्ज, सर्व सोईनीयुक्त व सुरक्षित असे वसतिगृह बांधायचे आहे. अनेक चांगल्या स्पर्धा भरवायच्या आहेत. समाजाला दिशा देण्यात पत्रकारांचा मोलाचा वाटा असून करवीर पत्रकार संघाचे कार्य उल्लेखनीय असे आहे. यावेळी ज्येष्ठ पत्रकार डॉ. सुभाष देसाई म्हणाले, ग्रामीण पत्रकार हा वर्तमानपत्राचा कणा आहे. त्यामुळे त्यांच्या गरजा, त्यांना मिळणाऱ्या सुविधा याकडे जबाबदार घटकांनी लक्ष दिलेच पाहिजे. राजर्षी शाहू महाराजांनी वर्तमानपत्रात बहुजनांचा आवाज उठला पाहिजे म्हणून अनेक बहुजनांना वर्तमानपत्र काढण्यासाठी प्रोत्साहित केले होते.
यावेळी ऍड.सी.बी.कोरे, सभापती आश्विनी धोत्रे, उपसभापती सागर पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अमर पाटील संघाचे अध्यक्ष दीपक मेटील, कृष्णा धोत्रे यांच्यासह संघाचे सर्व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत प्रा.एस.पी. चौगले यांनी तर आभार सचिव संजय पोवार यांनी मानले. सूत्रसंचालन उत्तम पाटील यांनी केले.