आरोग्य आणि स्वच्छतेबाबत नगरपालिका स्थापनेपासून दक्ष
प्रतिनिधी / कराड
कोरोनासारख्या महामारीचे संकट दारासमोर घोंगावत असताना उपचार करणारे डॉक्टर्स आता देवदूत भासू लागले आहेत. कराडच्या इतिहासाची पाने चाळताना 1855 साली स्थापना झालेल्या कराड नगरपालिकेने आरोग्य आणि स्वच्छतेबाबत स्थापनेपासून काळजी घेतल्याचे दिसते. 1855 च्या काळात कराडात उपचाराची काहीही सोय नव्हती. त्यावेळी साताऱयाहून डॉक्टर यायचे. पुढे 1865 साली नगरपालिकेचा पहिला दवाखाना सुरू झाला. या दवाखान्याच्या माध्यमातून लोकांची आरोग्याची सोय झाली. नगरपालिका तेव्हाही दक्ष होती. आजही आरोग्य आणि स्वच्छतेबाबत दक्ष आहे. सध्याच्या संकटकाळात नगरपालिका कर्मचारी पुरवत असलेल्या सेवांचे नागरिक मनापासून कौतुक करत आहेत.
नगरपालिकेच्या नागरी सेवांमध्ये प्रामुख्याने सामाजिक आरोग्याला अतिशय महत्वाचे स्थान आहे. यावरच लोकांचे भवितव्य अवलंबून असते. कराड नगरपालिकेने स्वातंत्र्यपूर्व काळातच लोकांच्या आरोग्यासाठी व सार्वजनिक स्वच्छतेसाठी काम करण्यास सुरूवात केली. नंतर झालेली भुयारी गटर योजना हा कराडकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचा टप्पा आहे. 1865 मध्ये उन्हाळय़ात कृष्णा-कोयना नदीचे पाणी खराब होऊ नये, यासाठी नदीवर पालिकेने रखवालदार नेमल्याचा उल्लेख इतिहासात आहे. 1859 मध्ये रस्ते सफाईसाठी सहा नोकर होते. 1866 मध्ये सार्वजनिक शौचालयांसाठी तात्पुरती व्यवस्था करण्यात आली होती. 1859 महामारीची साथ आली, त्यावेळी कराडात डॉक्टर उपलब्ध नव्हते. महामारीची साथ आटोक्यात आणण्यासाठी नगरपालिकेने साताऱयाहून डॉ. बाबुराव इच्छाराम यांना बोलावले होते.
नागरिकांच्या औषधोपचाराची सोय करण्यासाठी शहरात नगरपालिकेचा दवाखाना असावा, यासाठी पालिकेने प्रयत्न सुरू केले. त्यास मुर्त स्वरूप येऊन मार्च 1865 मध्ये पालिकेचा पहिला दवाखाना सुरू झाला. यामुळे शहरवासियांसह तालुक्यातील नागरिकांची सोय झाली. रामचंद्र दाजी डॉक्टर हे पालिकेच्या दवाखान्याचे पहिले डॉक्टर होते. त्यांना 40 रूपये पगार होता. सरकारने पुढे या दवाखान्यास ग्रॅण्ट देण्यास सुरूवात केली. 1909 मध्ये शवविच्छेदन गृह बांधण्यात आले. 1955 साली सुमारे 10 हजार रूग्णांवर या दवाखान्यात उपचार करण्यात आले. 1875 मध्ये प्लेग साथीचा अटकाव करण्यासाठी दवाखान्यातील नोकरांनी जीवापाड मेहनत घेतली. त्यामुळे नगरपालिकेने त्यांना 70 रूपये बक्षीस दिले होते, असा उल्लेख इतिहासात आहे.
नागरिकांच्या आरोग्य रक्षणासाठी पालिकेने विविध उपाययोजना केल्या. 1965 साली तत्कालीन नगराध्यक्ष स्वर्गीय पी. डी. पाटीलसाहेब यांनी, मोठमोठय़ा शहरांना जमले नाही, ते कराडमध्ये शक्य करून दाखवले. भुयारी गटार योजना साकारली. शौचालये, मोऱया या योजनेस जोडल्या. कराडकर नागरिकांच्या आरोग्य आणि स्वच्छतेत क्रांतिकारक बदल झाला. स्वच्छतेबाबत पालिका अगोदरपासून दक्ष होती. ही दक्षता पुढेही घेण्यात आली. त्यामुळे शहर गेल्यावर्षी स्वच्छतेत देशात प्रथम क्रमांकावर आले आहे. यावर्षीही येण्याची शक्यता आहे. 2003 सालीही शहर राज्यात अव्वल आले होते. कोरोनामुळे आज स्वच्छतेचे महत्व सर्वांना पटले आहे. या स्वच्छतेचा वसा पालिकेने पूर्वापार जपला आहे म्हणूनच कराडकर नागरिक सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने सुदैवी ठरले आहेत.