‘तरुण भारत’च्या नवदुर्गा सदराची वाचकांनी केली प्रशंसा : उत्स्फूर्तपणे नोंदविल्या सकारात्मक प्रतिक्रिया
मनीषा सुभेदार / बेळगाव
नवरात्रीनिमित्त ‘तरुण भारत’ने गेले 9 दिवस नवदुर्गा ही मालिका चालविली. या मालिकेद्वारे विविध क्षेत्रात काम करणाऱया महिलांची ओळख वाचकांना करून दिली गेली. या मालिकेला आणि निवडलेल्या नवदुर्गांना समाजातून उत्स्फूर्त अशा सकारात्मक प्रतिक्रिया आल्या.
यंदा सर्वच सण वेगळय़ा पद्धतीनेच करावे लागले. कोरोनाने सार्वजनिक उपक्रमांवर, सोहळय़ांवर निर्बंध आणले. शिवाय नवदुर्गांची निवड करणेसुद्धा एक आव्हानच होते. कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून अनेक महिला डॉक्टर, आरोग्य सेविका, परिचारिका आपापल्या कार्यक्षेत्रात कार्यरत आहेत. या सर्वांच्या कार्याची जाणीव आम्हाला निश्चितच आहे.
तथापि, जेंव्हा हॉस्पिटल्स बंद होते तेंव्हापासून डॉ. अंजली चिकोडी या कार्यरत राहिल्या. त्यांनी 150 हून अधिक रुग्णांवर उपचार केले. हे नोंद घेण्याजोगे होते. त्या बेळगावच्या ज्ये÷ फिजिशियन आहेत. त्यांच्या परिचयानंतर माजी नगरसेवक पंढरी परब यांनी त्यांचा सत्कार करून त्यांच्या कार्याची पोचपावती दिली.
शिक्षणक्षेत्रात कार्यरत असणाऱया डॉ. कीर्ती शिवकुमार यांचे व्यवस्थापन कौशल्य आविष्कारमुळे महिलांना ज्ञात होते. परंतु कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ आणि सायबर सुरक्षितता या दोन प्रश्नांवर त्या काम करतात. याबद्दल अनेकांना माहिती नव्हते. त्यांच्या लेखानंतर व्यवस्थापन आणि वरील दोन मुद्दय़ांसाठी त्यांची मदत मिळू शकते, असा विश्वास अनेक जणींनी व्यक्त केला.
नवदुर्गा शीतल भंडारी या अत्यंत पारदर्शक पद्धतीने केअर फॉर यूचे काम चालवितात. वंचित मुलांना बाहेरच्या जगाचे कुतूहल आहे हे जाणून त्यांनी या मुलांना सातत्याने बाहेरच्या जगाची ओळख करून दिली. त्यांना या कार्यात अनेक महिलांचे सहकार्य आहे. त्यांचा लेख प्रसिद्ध होताच अनेकांनी त्यांच्याबरोबर काम करण्याची इच्छा दर्शविली. ही या लेखाची फलनिष्पत्ती होय.
राजेश्वरी हिरेमठ यांच्या माहितीनंतर समाज माध्यमांवर त्यांच्यावर आणि ‘तरुण भारत’वर कौतुकाचा वर्षाव झाला. असे लढणे सोपे नाही आणि त्यांच्यामुळे इतरांनाही प्रेरणा मिळेल, असा विश्वास अनेकांनी व्यक्त केला. विशेष म्हणजे वनिता विद्यालय शाळेने ‘तरुण भारत’ला फोन करून त्यांची माहिती घेत त्यांचा सत्कार करणार असल्याचे सांगितले.
सुखदा बाडगी यांचा प्रवास वाचून अनेक तरुणींनी त्यांच्याबद्दल विचारणा केली. जाहिरात किंवा तत्सम क्षेत्रात प्रवेश करताना सुखदा यांचे मार्गदर्शन उपयोगी ठरेल, असे तरुणाईने सांगितले. डॉ. निरंजना या 32 वर्षांपासून प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. त्यापूर्वी त्या ज्ये÷ डॉक्टर आहेत. त्यांनी महिला व बालक यांच्यासाठी केलेले संशोधन बेळगावकरांना नव्याने कळले.
रुपा शरत कुमार यांची ओळख ही अनेक विशेष मुलांच्या पालकांसाठी उपयुक्त ठरली. त्यांचे स्वतःचे स्वमग्न आणि गतिमंद मुलांच्यासाठी वेब पोर्टल आहे. या मुलांसाठी त्यांनी अतिशय उपयुक्त अशी माहिती सर्वांसाठी खुली केली आहे. महत्त्वाचे म्हणजे त्या मुलींच्या शिक्षणावर भर देत असून मुलांच्या पालकांकडून शुल्क न घेता ते बँकेमध्ये मुलींच्या शिक्षणासाठी गुंतविण्याची सूचना करतात, हे महत्त्वाचे.
भारती कुडचीमठ यांचे पौरोहित्य करणे हे सर्वांसाठीच विशेष असे ठरले. महिलांना पौरोहित्य करण्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार महिला बजावू शकते, हेच त्यांनी अधोरेखीत केले. त्यामुळे हे क्षेत्रसुद्धा महिलांना स्वावलंबी करू शकते याची जाणीव झाली आणि इतरांसाठी ही पाऊलवाट खुली झाली.
शहर स्वच्छतेसाठी झटणाऱया यल्लव्वा गोल्लर यांचेही विशेष कौतुक झाले. पतीशिवाय त्या एकटय़ाच तीन मुलांना घेऊन कुटुंब चालवत आहेत. हे तर महत्त्वाचेच. परंतु आपण निर्माण केलेला कचरा या महिला उचलतात तेंव्हा त्यांच्याकडे सन्मानानेच पहावे हा उल्लेख अनेकांना अंतर्मुख करून गेला. त्यांनी व्यक्त केलेली कचरा विघटनाची साधी अपेक्षा आपल्याला नक्कीच पूर्ण करता येईल.
कर्तृत्ववान महिलांना प्रकाशात आणले
‘तरुण भारत’मध्ये नवदुर्गा हे सदर सुरू झाल्यापासून नेहमीच वेगवेगळय़ा परंतु कर्तृत्ववान महिलांना प्रकाशात आणले गेले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या नवदुर्गांचे काम अधिक उठून दिसले. महिलांनी चोखाळलेली नवीन वाट, तिचे कर्तृत्व किंवा समाजाप्रती तिचे योगदान ‘तरुण भारत’ने नेहमीच महत्त्वाचे मानले. महिलांचे ‘दिसणे’ यापेक्षा त्यांचे असणे महत्त्वाचे आहे. त्यामुळेच कपडय़ांनी खुलवलेल्या सौंदर्यापेक्षा कर्तृत्वाने सुंदर असणाऱया महिलांचे योगदान फार महत्त्वाचे आहे. याच निकषावर ‘तरुण भारत’च्या नवदुर्गा या सदराची वाचकांनीही प्रशंसा केली.