बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी कमी होत चालली आहे. शुक्रवारी राज्यातील कोरोना सकारात्मकता दर ४.८६ टक्क्यांवर आला. आरोग्य विभागाने कोरोना सकारात्मकता दर पाच टक्क्यांपेक्षा कमी करण्याचे लक्ष्य ठेवले होते, जे अनलॉक करण्यासाठी आवश्यक आहे. राज्य दररोज अनलॉकच्या दिशेने वाटचाल करीत आहे. त्यानुसार कोरोनाची दैनंदिन रुग्णसंख्या ५ हजारापेक्षा कमी असायला हवी.
दरम्यान गेल्या २४ तासात राज्यात कोरोनाच्या ८,२४९ नवीन रुग्णांची नोंद झाली. राज्यात यापूर्वी १३ एप्रिल रोजी ८,७७८ रूग्णांची नोंद झाली होती. राज्यात आतापर्यंत एकूण २७,४७,५३९ रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी २५,११,१०५ लोकांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर ९१.३९ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. शुक्रवारी कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या १४,९७५ इतकी होती.
राज्यात कोरोनामुळे आतापर्यंत एकूण ३२,६४४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यातील १५९ रुग्णांचा मृत्यू शुक्रवारी झाला आहे. राज्यात सध्या २,०३,७६९ सक्रिय प्रकरणे आहेत. शुक्रवारी राज्यात मृत्यूचे प्रमाण १.९२ टक्के होते.