दोडामार्ग – वार्ताहर-
कळणे मधील मे. मिनरल्स अँड मेंटल्स कंपनीकडून केवळ घरांसाठी देण्यात आलेली 12 लाखांची भरपाई वगळता शासनाकडून अद्याप पर्यन्त एक शदाम देखील देण्यात न आल्याने तीव्र संताप व्यक्त करत कळणेवासीय आपल्या 15 ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनाच्या उपोषणावर ठाम आहेत. उद्या सकाळी 10 वाजता कळणे ग्रामस्थ बांध फुटलेल्या घटनास्थळी एकवटणार असून तेथील मातीयुक्त पाण्यात उपोषणास बसणार आहेत. कळणे मायनींग हद्दपार करा या मागणीने पुन्हा एकदा जोर धरला आहे.
गेल्या महिन्यात कळणे मायनिंगमधील पाण्याचा बांध फुटून ते पाणी व माती आसपासच्या शेती बागायतीत तसेच गमस्थांच्या घरदारात घुसले. अनेकांच्या उत्पनाचे साधन असलेली शेती बागायती नष्ट झाली. तसेच घरदारांचे व आतील मालमत्तेचेही नुकसान झाले. घटना घडल्यापासून ते आजच्या दिवसापर्यन्त राज्य शासनाकडून कोणतीच तातडीची भरपाई देण्यात आलेली नाही. केवळ मे. मिनरल्स अँड मेंटल्स कंपनीने घरांची नुकसान भरपाई म्हणून 12 लाख रुपये नुकसानग्रस्त ग्रामस्थांना दिले. मात्र शासनाने तोंडाला पाणी पुसले असा आरोप कळणेवासीयांनी केला असून वरील मायनींग कंपनीने दिलेली भरपाई रक्कम ही देखील तुटपुंजी आहे असे ग्रामस्थांनी सांगितले. व उद्या उपोषणास बसणार असल्याचेही स्पष्ट केले. दरम्यान कळणे मायनींग कायमचे बंदच करा या मागणीचा पुनरुच्चार कळणेवासीयांनी केला आहे.