पेचप्रसंग कायम, आमदारांच्या संख्येसंबंधी अद्याप साशंकता, राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरूच
वृत्तसंस्था/ जयपूर
काँगेस नेते सचिन पायलट याच्या बंडामुळे राजस्थानात निर्माण झालेला राजकीय पेचप्रसंग अद्याप कायम आहे. राज्यपाल कलराज मिश्र यांनी मुख्यमंत्र्यांना 14 ऑगस्टला विधानसभा अधिवेशन घेण्याची अनुमती दिली आहे. मात्र, काँगेस अद्यापही अस्वस्थ असल्याचे दिसत असून शुक्रवारी मुख्यमंत्री गेहलोत यांनी आपल्या गटाच्या आमदारांना जैसलमेरच्या रिझॉर्टमध्ये हलविले आहे.
गेहलोत यांच्या गटात किती आमदार आहेत, याविषयी अद्यापी साशंकता आहे. काही वृत्तसंस्थांच्या मते त्यांच्याकडे केवळ 97 आमदार आहेत. बहुमतासाठी 101 आमदारांची आवश्यकता आहे. गेहलोत गटाचे अनेक आमदार आमच्या संपर्कात असून डांबून ठेवण्यात आले आहे. सुटका होताच ते आमच्याकडे येतील, असा दावा सचिन पायलट यांच्या गटाकडून करण्यात आला आहे.
तीन विमानांमधून पाठवणी
मुख्यमंत्री गटाच्या 54 आमदार ांची जैसलमेरला पाठवणी तीन विमानांमधून करण्यात आली. आणखी आमदार येत्या एक दोन दिवसांमध्ये पाठविले जातील असे सांगण्यात आले. 13 जुलैपासून हे आमदार रिझॉर्टमध्येच वास्तव्याला आहेत. विधानसभा अधिवेशनाची घोषणा झाल्यापासून आमदारांना अधिक रकमेची लालूच दाखविण्यात येत असल्याचा आरोप गेहलोत यांनी केला.
मायावतींवर टीका
गेहलोत यांनी मायावतींवरही जोरदार टीका केली. बसपच्या सर्व सहा आमदारांनी स्वच्छेने काँगेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्यावर कोणतेही दडपण नव्हते. त्यामुळे हे पक्षांतर कायद्याच्या चौकटीतच झाले. तथापि, मायावती भाजपसाठी काम करत असल्याने त्यांनी उच्च न्यायालयात या पक्षांतराविरोधात याचिका सादर केली. भाजप सीबीआयचा उपयोग राजकीय कारणासाठी करत असून काँगेस या सूडबुद्धीसमोर नमणार नाही, असे अनेक आरोप गेहलोत यांनी केले.
बंडखोरांशी संपर्क अशक्य
बंडखोर आमदारांना हरियाणातील गुरगाव येथे ठेवण्यात आले असून राजस्थान पोलिसांच्या विशेष दलाला त्यांच्यापर्यंत पोहचू देण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांची सुटका करण्यात यश आले नाही, असा दावाही गेहलोत यांनी केला. भाजपने या सर्व आरोपांचा इन्कार केला असून गेहलोत यांच्यावरच शरसंधान केले.
लपवाछपवी का ?
गेहलोत यांना बहुमताविषयी आत्मविश्वास असेल तर ते आपल्या आमदारांना लपवत का आहेत, असा प्रश्न भाजपने केला. मुख्यमंत्र्यांचा आपल्याच आमदारांवर विश्वास नाही. त्यामुळे त्यांना देखरेखीत ठेवले. त्यांना मोकळे सोडल्यास त्यांच्यापैकी काहीजण बंड करतील या धास्तीने मुख्यमंत्र्यांना पछाडले आहे, असे अनेक प्रत्यारोप भाजपच्या आमदारांकडून करण्यात आले.