वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
काँगेस पक्ष कमकुवत झाला आहे. या पक्षाला पुन्हा बळ प्राप्त करून द्यायचे असल्यास चार भिंतींमधून बाहेर पडून जनतेसाठी काम करावे लागणार असल्याचे उद्गार नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी मंगळवारी काढले आहेत. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी देशात तिसरी आघाडी निर्माण करण्याची गरज व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर अब्दुल्ला यांनी हे विधान केले आहे.
काँग्रेस आता कमकुवत झाल्याचे अत्यंत प्रामाणिकपणे सांगत आहे. काँग्रेस देशाला वाचवू इच्छित असल्यास त्याला झोपेतून जागं व्हावे लागेल आणि मजबुतीने उभे रहावे लागेल. जनतेच्या समस्यांकडे लक्ष द्यावे लागणार आहे. घरात बसून राहिल्यास असे घडणार नसल्याचे अब्दुल्ला म्हणाले. पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीकरता संपुआतील अनेक घटक पक्षांनी काँग्रेसऐवजी तृणमूल काँग्रेसला पाठिंबा दर्शविला आहे. तसेच तृणमूल काँग्रेससाठी प्रचारही चालविला आहे. यामुळे विरोधी पक्षांमधील फूट ठळकपणे समोर आली आहे. राज्यात काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी आघाडी केली आहे.