रेल्वे विभागाच्या निष्काळजीपणामुळे शहरात वाहतूक कोंडी : पहिल्या रेल्वेगेटवर खडीमुळे अडथळा : तिसऱया गेटवर अपघातात दोन महिला जखमी
प्रतिनिधी / बेळगाव
रेल्वे विभागाच्या निष्काळजीपणाचा फटका शहरवासियांना बसत आहे. बुधवारी काँग्रेस रोड परिसरात पहिल्या रेल्वेगेटजवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पहिले रेल्वेगेट येथे टाकण्यात आलेल्या खडीमुळे वाहने अडकत होती. यामुळे वाहने जाण्यास अडथळा निर्माण होत असल्यामुळे वाहनांच्या लांबच रांगा लागल्या होत्या. त्यामुळे रेल्वे प्रशासनाला शहाणपणा कधी येणार? असा प्रश्न शहरवासीय उपस्थित करीत आहेत.
बुधवारी सकाळपासून दुसऱया रेल्वेगेटच्या कामाला सुरुवात करण्यात आली. यामुळे दिवसभर हे रेल्वेगेट बंद ठेवण्यात आले होते. चौथ्या, तिसऱया व पहिल्या रेल्वेगेट परिसरातील दुरुस्तीची कामे पूर्ण झाल्यानंतर आता दुसऱया गेटची दुरुस्ती बुधवारी करण्यात आली. रेल्वे मार्गाच्या बाजूला खडी टाकणे, ट्रकची दुरुस्ती करणे अशी विविध कामे रेल्वे विभागाकडून हाती घेण्यात येत आहेत.
ट्रक दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर रेल्वेगेट परिसरात खडी टाकली जात आहे. या खडीमध्ये वाहने अडकली जात असल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. नागरिकांनी मागणी केल्यानंतर अनगोळ येथील चौथे रेल्वेगेट येथे पेव्हर्स बसविण्यात आले. परंतु अद्याप तिसरे व पहिले रेल्वेगेट येथे पेव्हर्स बसविण्यात आले नसल्याने दुचाकी व चार चाकी वाहने अडकत आहेत.
खडीमुळे होताहेत अपघात
ट्रकशेजारी मोठी खडी टाकण्यात आल्यामुळे त्यामध्ये वाहने अडकण्याचे प्रमाण वाढले आहे. बुधवारी या खडीमध्ये वाहने अडकून अपघातही घडले. यामध्ये दोन महिला जखमी झाल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी दिली. एखाद्याचा जीव गेल्यानंतरच रेल्वे प्रशासनाला जाग येणार का? असा प्रश्न वाहनचालक विचारत आहेत.