शॉर्टसर्किटने आग : समारे दोन लाख हानीचा प्राथमिक अंदाज
प्रतिनिधी / वेंगुर्ले:
कामळेवीर बाजारपेठेच्या मागील भागातील गुरुनाथ गवळी व संदीप वेंगुर्लेकर यांच्या काजू बागेस बुधवारी दुपारी शॉर्टसर्किटमुळे आग लागून काजूची 150 कलमे जळून खाक झाली. यात सुमारे दोन लाखाचे नुकसान झाले. स्थानिक ग्रामस्थांनी अथक प्रयत्नाने आग आटोक्यात आणल्याने आणखी अनर्थ टळला.
कामळेवीर बाजारपेठेनजीकच्या गवळी व वेंगुर्लेकर यांच्या काजू बागेतून विद्युत वाहिनी गेली आहे. यापूर्वी अनेकवेळा येथील बागांमध्ये शॉर्टसर्किट होऊन बागांचे नुकसान झाले आहे. या संदर्भात वीज वितरणकडे वारंवार तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आला आहे. बुधवारी दुपारी 12.30 च्या सुमारास बागेत शॉर्टसर्किट होऊन आग लागली. बागेत गवत वाढलेले असल्याने व गवताच्या गंजीही असल्याने आग फोफावत गेली. सदर आगीची माहिती मिळताच पत्रकार शेखर सामंत यांनी लगेच वेंगुर्ले न. प. च्या अग्निशमन बंबास माहिती दिली. स्थानिक ग्रामस्थांनीही तेथे घाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. वेंगुर्ले न. प. चे पांडुरंग नाटेकर, सागर चौधरी, हेमंत चव्हाण, पाटणकर, गौरव आरेकर, उमेश वेंगुर्लेकर, उमेश पुनाळेकर, श्रीपाद सामंत, अमोल जाधव या कर्मचाऱयांनीही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. या आगीत गवळी व वेंगुर्लेकर यांच्या मालकीची 150 काजू कलमे जळून सुमारे दोन लाखाचे नुकसान झाले.