राकेश टिकैत यांचा पुन्हा इशारा – सिंघू सीमेवरच बस्तान मांडण्याचा निर्धार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी कृषी कायदे मागे घेण्यासाठी केंद्र सरकारला 2 ऑक्टोबरपर्यंत अल्टिमेटम दिला आहे. त्याचबरोबर शुक्रवारी पुन्हा त्यांनी सरकारला इशारा देत कायदे मागे घेईपर्यंत घरवापसी करणार नसल्याचे वक्तव्य केले आहे. नजिकच्या काळात शेतकरी आंदोलनाला अधिक तीव्र बनवण्यासाठी तीन राज्यात महापंचायती आयोजित करून तेथे स्वतः उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेले शेतकरी संघटनांचे आंदोलन दिवसेंदिवस अधिकच तीव्र होत असल्याचे दिसत आहे. 79 दिवसांनंतरही आंदोलनावर अद्याप तोडगा निघालेला नाही. शेतकरी संघटना कायदा रद्द करण्याच्या आपल्या मागणीवर ठाम आहेत. कृषी कायदे रद्द झाल्यावरच घरवापसी होणार, आमचा ‘मंच आणि पंच’ सारखाच राहील. सिंघू सीमा हेच आमच्या आंदोलनाचे मुख्य स्थळ असून येथे चर्चेसाठी आम्ही सदैव उपलब्ध आहोत असे सांगत दिल्लीतील खिळे काढल्याशिवाय आम्ही जाणार नसल्याचा निर्धार भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी व्यक्त केला आहे.
आम्ही पंचायती प्रणालीला मानणारे लोक आहोत. आम्ही निर्णयाच्या दरम्यान पंच बदलत नाही आणि मंचदेखील बदलत नाही. चर्चा करण्याची सरकारची जी लाईन होती, त्याच लाईनवर त्यांनी चर्चा करावी. आमच्या बाजूने आम्ही चर्चेसाठी तयार आहोत, असेही टिकैत यांनी सांगितले.
महाराष्ट्रासह 3 राज्यात ‘महापंचायती’ घेणार
दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेले आंदोलन अधिक तीव्र करण्याच्या हेतूने आता राज्या-राज्यांमध्ये कृषी सभा-मेळावे घेण्याला सुरुवात झाली आहे. येत्या 14 तारखेपासून हरियाणा, महाराष्ट्र आणि राजस्थान या तीन राज्यांमध्ये अशा शेतकऱयांच्या सभा होणार आहेत. या सभांमध्ये राकेश टिकैत हे स्वतः मार्गदर्शन करणार आहेत. तीन राज्यात 7 सभांना ते संबोधित करणार असल्याची माहिती किसान युनियनने दिली. या सभांना ‘महापंचायती’ असे संबोधण्यात आले असून महाराष्ट्रातील अकोला येथे याचे आयोजन केले जाणार आहे. शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी कृषी कायदे मागे घेण्यासाठी केंद्र सरकारला 2 ऑक्टोबरपर्यंत अल्टिमेटम दिला आहे. शनिवारी ‘चक्का जाम’नंतर दिल्ली-उत्तर प्रदेश गाझिपूर सीमेवर शेतकऱयांना संबोधित करताना त्यांनी ‘कोणत्याही दडपणाखाली आम्ही सरकारशी चर्चा करणार नाही, व्यासपीठ समतुल्य असेल तेव्हा चर्चा होईल’ असेही त्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.