वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
उत्तर प्रदेशातील प्रसिद्ध कावड यात्रेला प्रारंभ झाला असून केंद्र सरकारने त्यासाठी विशेष दिशानिर्देश लागू केले आहेत, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाने दिली आहे. या कावड यात्रेच्यावेळी दहशतवादी हल्ला होणार असल्याची माहिती गुप्तचर यंत्रनांनी दिल्यामुळे सुरक्षेसंबंधी विशेष सावधगिरी बाळगण्यात येत आहे. राज्य सरकारांनाही सतर्क करण्यात आले आहे.
श्रावणमासाच्या आरंभापासून भारताच्या विविध राज्यांमध्ये कावड यात्रेचा प्रारंभ केला जातो. ही कावड यात्रा शिवभक्तांकडून केली जाते. ती साधारणतः एक पंधरवडा चालते. दवरर्षी साधारणतः 4 कोटी कावड यात्री हरिद्वार आणि ऋषीकेश येथून गंगा नदीचे पवित्र जल घेण्यासाठी तेथे पोहोचतात. उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्ली, हिमाचल प्रदेश, पंजाब, राजस्थान,मध्यप्रदेश इत्यादी अनेक राज्यातील कावड यात्री या धार्मिक सोहळय़ात सहभागी होत असतात.
झारखंडमधील देवघर येथेही ही कावड यात्रा होत असते. गेली दोन वर्षे कोरोनाच्या उद्रेकामुळे यात्रेला अनुमती नाकारण्यात आली होती. यंदा दोन वर्षानंतर प्रथमच ती पुन्हा होत असल्याने भाविकांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण आहे. यंदा यात्रेसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे. मात्र, भाविकांनी आणि नागरिकांनीही सावध रहावे, असा इशारा देण्यात आला आहे.