प्रतिनिधी / सातारा :
वाई तालुक्यात असलेल्या किल्ले वंदनगडासंदर्भात पत्रव्यवहार करताना सातारा वनविभागाने एका पत्रात त्याची नोंद ‘पीर किल्ले वंदनगड’ केली आहे. हे विद्रूपीकरण थांबवण्यात यावे, अशी मागणी हिंदूत्ववादी संघटनांनी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी नगरसेवक विजयकुमार काटवटे, विश्व हिंदु परिषदेचे शहर मंत्री जितेंद्र वाडकर, श्री शिवप्रतिष्ठानचे प्रतिक कुलकर्णी आदी उपस्थितीत होते.
सातारा जिल्ह्यातील वंदनगडाच्या इतिहासाच्या नोंदी पहाता छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खानाचा वध करून त्याच्या दुसऱ्याच दिवशी विजयी घोडदौड करून स्वराज्याच्या सिमांचा विस्तार केला. सातारा जिल्ह्यातील चंदनगड व वंदनगड स्वराज्यात दाखल झाले.
या गडकोटांची नावं जाणिवपुर्वक पालटुन समाजात ताणतणाव निर्माण करण्याचे काम काही शासकीय विभागातुन होताना दिसत आहे. गडाचे मुळ नाव ‘वंदनगड’ असताना त्या गडाच्या संदर्भात पत्रव्यवहार करताना सातारा वनविभागाने एका पत्रात त्याची नोंद ‘पीर किल्ले वंदनगड’ केली आहे असे आढळून आले. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीत कोणत्याही गडाला अशा पद्धतीने नाव दिले आहे, असे कोठेही इतिहासात नोंद नाही. तसेच जिल्ह्यातील व इतिहासाचा अभ्यास केला असता त्यातही या गडाचे नाव वंदनगड आहे असे लक्षात येते. इतिहासात नोंदी असतानाही सातारा जिल्हा वनविभागाने त्याचा पत्रव्यवहार करताना या गडाचे नाव पालटुन ‘पीर किल्ले वंदनगड’ असे केले आहे. हे विद्रूपीकरण थांबवण्यात यावे, अशी मागणी हिंदूत्ववादी संघटनांनी केली आहे. तसेच छत्रपती शिवरायांच्या गडकोटांचे नाव परस्पर बदलणाऱ्या संबंधीत अधिकाऱ्यांची चौकशी करावी, अन्यथा राज्यभरात आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.