प्रतिनिधी / खानापूर
गेल्या ऑगस्ट महिन्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे मलप्रभा नदीला महापूर आला होता. त्यावेळी कुप्पटगिरी, ता. खानापूर येथील गावात मलप्रभा नदीकाठावर असलेले सर्व विद्युतखांब उन्मळून पडून वीजपुरवठा बंद झाला होता. पण अद्याप ते खांब पुन्हा उभे करण्यात आले नाहीत. यामुळे शेतकऱयांच्या विद्युत मोटारींचा वीजपुरवठाही खंडित झाला आहे. ऐन हंगामात पिकांना पाणी न मिळाल्याने शेतकऱयांची पिके धोक्यात आली असून नदीकाठावर उन्मळून पडलेले विद्युतखांब तातडीने उभे करून विद्युतपुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी कुप्पटगिरी येथील शेतकऱयांनी हेस्कॉमच्या साहाय्यक कार्यकारी अभियंत्या कल्पना तिरवीर यांच्याकडे केली आहे. या संदर्भात निवेदनही सादर केले आहे. विद्युत मोटारींद्वारे पिकांना मलप्रभेचे पाणी दिले जाते. पण सध्या वीज खांबच पडल्याने सर्व मोटारीच बंद पडल्या आहेत. यामुळे मिरची व इतर पिकांची लागवड कशी करावी, अशी चिंता कुप्पटगिरी परिसरातील शेतकऱयांना लागून राहिली आहे. याची गांभीर्याने दखल घेऊन विद्युतखांब ताडतीने उभे करावेत व वीजपुरवठा पूर्ववत करण्याची विनंती निवेदनात केली आहे. याप्रसंगी मदन पाटील, ज्ञानेश्वर भालकेकर, बसवंत पाटील, नागेंद्र पाटील, प्रभाकर पाटील, दिलीप पाटील, व्यंकट पाटील, परशराम र. पाटील, सिद्राय पाटील, परशराम जो. पाटील, संजय पाटील, अर्जुन पाटील, व्हन्नाप्पा गुंजीकर, संजय पाटील, संतोष पाटीलसह अनेकजण उपस्थित होते.