तरुण भारत संवाद प्रतिनिधी / कुर्डुवाडी
कुर्डुवाडी शहरात कोरोनाचा उद्रेक होऊ पहात आहे. बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून मृतांचाही आकडा वाढत असल्याने शहरात जनता कर्फ्यूबाबतची मागणी जोर धरत असल्या कारणाने आज नगरपालिकेच्या भिसे सभागृहात नगराध्यक्ष समीर मुलाणी यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील व्यापारी व नागरिक यांच्यात झालेल्या चर्चेनंतर ५ दिवसांचा जनता कर्फ्यू नगराध्यक्ष समीर मुलाणी यांनी जाहीर केला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे, उपनगराध्यक्षा उर्मिला बागल, नगरसेवक संजय गोरे, सहा पोलिस निरीक्षक चिमणाजी केंद्रे यांच्यासह नगरसेवक नागरिक उपस्थित होते.
आजपर्यंत शहरात अनेकवेळा बंद पुकारण्यात आला तो नागरिकांच्या सहकार्यामुळे यशस्वी ही झाला. परंतू या काळात अनेकजण छुपा व्यवसाय करत असल्यामुळे काहींचा या बंदला विरोध होता. मात्र चर्चेच्या गदारोळानंतर नगराध्यक्ष समीर मुलाणी यांनी बुधवार दि. ९ सप्टेंबर ते १३ सप्टेंबर पर्यंत जनता कर्फ्यूची घोषणा केली असून या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहतील. दुध सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत व सायंकाळी ५ ते ७ वाजेपर्यंत चालू राहील असे सांगितले.