ओनलाईन/टीम
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला कुस्तीमध्ये रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं आहे. पदक एक रौप्य आणि तीन कांस्यपदके जिंकणाऱ्या भारताला सुवर्णपदकाचे वेध लागले होते. कुस्तीमध्ये ५७ किलो वजनी गटात रवीकुमार दहियाचा अंतिम सामना रशियाच्या जावूर युगुयेवशी झाला, पण युगुयेवने आपला अनुभव पणाला लावत ही लढत ७-४ ने जिंकली.
रवीला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले असून भारताच्या खात्यात अजून एक पदकाची नोंद झाली आहे. रवीने उपांत्य फेरीत कझाकिस्तानच्या सनायेव नुरिस्लामचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
रवी आणि युगुयेवे दोघेही सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये होते. यापूर्वी या दोघांची भेट २०१९च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये झाली होती. त्यानंतर रशियन पैलवानाने भारतीय कुस्तीपटूला चुरशीच्या सामन्यात ६-४ने पराभूत केले. या स्पर्धेत रवीला कांस्यपदक मिळाले. रवीने २०२० आणि २०२१ आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले. त्याचबरोबर त्याने २०१८ च्या अंडर-२३ चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक जिंकले.