मगो नेते सुदिन ढवळीकर यांचा सवाल
प्रतिनिधी / पणजी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे कोटय़वधीचे पॅकेज (20 लाख कोटी) जाहीर केले आहे त्यातील गोवा राज्याला किती वाटा मिळणार ते मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गोंमतकीय जनतेला सांगावे, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री तथा मगो नेते सुदिन ढवळीकर यांनी केली आहे.
काल शुक्रवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. केंद्राच्या पॅकेजचा गोव्याला किती फायदा होणार, किती लाख कोटी गोव्यात मिळणार ते सावंत यांनी जाहीर करावे, इतर राज्यांतील मुख्यमंत्र्यांनी आपापल्या राज्यासाठीचे पॅकेज घोषित केले आहे. तसे ते सावंत यांनी गोव्याकरीता घोषित करावे. केंद्रातील पॅकेजमधून गोवा राज्याला किती कोटी मिळणार, हे गोमंतकीय जनतेला कळाले पाहिजे. त्याची आकडेवारी सावंत यांनी सांगण्याची गरज आहे. मोदी किंवा केंद्राने गोव्याला किती वाटा मिळणार ते काही सांगितलेले नाही. मग ते काम राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे आहे, असेही ढवळीकर यांनी सूचित केले.
एवढी विलगीकरण व्यवस्था आहे काय?
सावंत सरकारमधील काही मंत्री रेल्वे बंद करण्याची मागणी करतात तर दुसऱया बाजूने देश-परदेशातील सुमारे 1 लाख गोमंतकीय राज्यात येणार असल्याने रेल्वे, विमान वाहतूक सुरू ठेवावी लागेल असे डॉ. सावंत म्हणतात. आता एवढे लोक जर गोव्यात आले तर त्यांना विलगीकरणात ठेवण्यासाठी पुरेशी व्यवस्था गोव्यात आहे का? असा प्रश्न ढवळीकर यांनी उपस्थित केला.काही मंत्री अशिक्षितांसारखे वागतात. त्यांना सरकारने काढलेल्या परिपत्रकाची देखील माहिती नसते, असा टोमणा ढवळीकर यांनी मारला. मुख्यमंत्र्यांचे आपल्या सहकारी मंत्र्यांवरच नियंत्रण नाही. गोवा राज्याला आर्थिक पॅकेज माहीत नाही, उलट हे राज्य कर्ज काढण्यात मग्न आहे, असे ते म्हणाले.