बारावीची संपूर्ण परीक्षा यशस्वी
प्रतिनिधी / पणजी
गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची (गोवा बोर्ड) बारावीची शिल्लक राहिलेल्या तीन पेपर्सची परीक्षा काल शुक्रवारी संपुष्ठात आली. बारावीच्या सुमारे 800 विद्यार्थ्यांनी शुक्रवारी भूगोल विषयाचा शेवटचा पेपर दिला. आता बारावीची संपूर्ण परीक्षा घेण्यात बोर्डाला यश आले असून निकाल लवकर देण्याचे आव्हान बोर्डासमोर आहे. 20 ते 22 मे या तीन दिवसांच्या कालावधीत मिळून सुमारे 3500 विद्यार्थ्यांनी उर्वरित तीन पेपर्सची परीक्षा दिली. आता त्यांना निकालाची प्रतीक्षा लागून राहिली आहे.
दरवर्षी मार्च महिन्यात बारावीची परीक्षा संपुष्ठात येते आणि एप्रिलच्या शेवटच्या किंवा मे महिन्यात दुसऱया आठवडय़ापर्यंत निकाल जाहीर करण्यात येतो. यंदा मात्र लॉकडाऊनमुळे परिस्थिती बदलली असून बारावीची संपूर्ण परीक्षा संपण्यास मे महिन्याचा शेवटचा आठवडा उजाडला आहे. त्यामुळे परीक्षेचा निकाल उशिरा होण्याची शक्यता आहे. कोणतीही अडचण न येता बारावीची परीक्षा पूर्ण झाली असून आता विद्यार्थी व पालकांचे लक्ष निकालाकडे लागले आहे.
दहावीची परीक्षा देखील नुकतीच सुरू झाली असून ती देखील अशीच सुरक्षित पार पडली अशी विद्यार्थी व पालकांची इच्छा आहे. दहावी परीक्षाही एप्रिल महिन्यातच संपते आणि त्या परीक्षेचा निकाल मे महिन्याच्या शेवटपर्यंत लावण्यात येतो. यंदा मात्र हा निकाल जून महिन्याच्या अखेरीस म्हणजेच पावसात लागणार, असा अंदाज आहे. त्याचा परिणाम म्हणून अकरावीच्या प्रवेशालाही महिनाभर उशीर होणार आहे. त्यामुळे सर्व काही जुलै महिन्यात सुरू होण्याची अपेक्षा आहे.
कोरोना लॉकडाऊनमुळे परीक्षांचे, निकालाचे वेळापत्रक हलले असून ते सुमारे महिनाभर किंवा त्यापेक्षा जास्त दिवस पुढे जाणार आहे. त्यामुळे नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात, प्रवेश लांबणीवर पडू शकतो, असे संकेत मिळत आहेत.