नवी दिल्ली / वृत्तसंस्था
गेल्या दोन-चार दिवसात दिल्लीत राजकीय हालचालींनी वेग घेतल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल आणि विस्तार होण्याच्या चर्चेला पुन्हा उधाण आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर फेरबदलांबाबतची शक्यता अधिकच वाढली. पुढील वर्षाच्या प्रारंभी उत्तर प्रदेशसह अन्य राज्यांमध्ये होणाऱया विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळाला नवा साज देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे समजते.
मागील काही दिवसांपासून भाजपच्या उच्चस्तरीय गोटात वाढलेल्या हालचाली आणि बैठकांच्या सत्रामुळे मंत्रिमंडळ विस्ताराबाबत तर्क-वितर्क व्यक्त केले जात आहेत. यासंबंधी केंद्र सरकार किंवा भाजपच्या पातळीवरून अधिकृत माहिती देण्यात आली नसली तरी राजकीय बैठकांचा जोर वाढल्याचे दिसत आहे. त्यातच गेले दोन दिवस उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही दिल्लीदरबारी विविध बैठकांमध्ये सहभाग नोंदवल्यामुळे राजकीय खांदेपालटाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. तसेच उत्तर प्रदेशमधील भाजपचा सहकारी पक्ष असलेल्या ‘अपना दल’च्या सर्वेसर्वा अनुप्रिया पटेल यांनीही अमित शहा यांच्यासह अन्य भाजप नेत्यांची भेट घेतली आहे.
अलीकडेच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप चमक दाखवू शकला नव्हता. त्याबरोबरच कोरोनाचा वाढता संसर्ग, वाढती महागाई आणि इंधन दरवाढीमुळे भाजपविरोधात वातावरण तप्त होत आहे. या पार्श्वभूमीवर टीकेची धार बोथट करण्यासाठी मोदी सरकारकडून राजकीय खांदेपालट करण्याची तयारी सुरू असल्याचे दिसत आहे. पुढील वषी उत्तरप्रदेश, गोव्यासह पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होणार असल्यामुळे भाजपकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.
मंत्र्यांच्या कामकाजाचा पंतप्रधानांकडून आढावा
कोरोना संसर्गाशी लढा देतानाच पंतप्रधान मोदींनी केंद्रीय मंत्र्यांच्या कामाचीही झाडाझडती सुरू केली आहे. मंत्र्यांचा गट तयार करून त्यांनी बैठकांचे सत्र सुरू केले आहे. आतापर्यंत तीन बैठका झाल्या असून केंद्रीय मंत्र्यांनी आपापल्या कामकाजाचा लेखाजोखा मांडला आहे.