राज्यसभेत गदारोळ – भाजपने दिले प्रत्युत्तर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात अलिकडेच सामील करण्यात आलेले पश्चिम बंगालमधील खासदाराला तृणमूल काँग्रेसने कथितरित्या ‘बांगलादेशी’ संबोधिल्याने पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभेत गदारोळ झाला आहे. याप्रकरणी सरकारने स्पष्टीकरण द्यावे अशी मागणीही करण्यात आली आहे. या मुद्दय़ावरील गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले होते.
दोनवेळा तहकुब करावे लागल्यावर सोमवारी दुपारी 2 वाजता सभागृहाचे कामकाज सुरू होताच तृणमूल काँग्रेसचे खासदार सुखेंदु शेखर रॉय यांनी नियमांचा दाखला देत पंतप्रधान मोदींनी स्वतःच्या मंत्रिमंडळातील सहकाऱयांची यादी सभागृहात मांडली असून यातील एक राज्यमंत्री कथितरित्या बांगलादेशी असल्याचा दावा केला. आपण यासंबंधी एक नोटीस दिली आहे. केंद्रीय राज्यमंत्री बांगलादेशी आहे की नाही हे जाणून घेण्याचा मला पूर्ण अधिकार असल्याचे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटले आहे.
सत्तारुढ भाजपच्या खासदारांनी या मागणीला तीव्र विरोध दर्शविला. सभागृहाचे नेते पियूष गोयल यांनी विरोधी खासदारांचे आरोप निराधार ठरविले. तसेच उपसभापती हरिवंश यांना तृणमूल खासदाराच्या टिप्पणीला सभागृहाच्या कामकाजातून वगळण्याची विनंती केली. उपसभापती हरिवंश यांनी याबाबत पडताळणी करून निर्णय घेतला जाणार असल्याचे म्हटले आहे.
सभागृहात निराधार गोष्टी मांडण्याचा प्रयत्न होत असून आम्ही याची घोर निंदा करतो. तृणमूल काँग्रेसच्या आरोपात सत्यता नाही. विरोधी खासदार हे समाजाच्या एका विशिष्ट वर्गाचा अपमान करत असल्याचे गोयल यांनी म्हटले आहे.