प्रतिनिधी / कुर्डुवाडी
केंद्र सरकारने केलेले शेतकरी विरोधी कायदे रद्द करावे यांसह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी पक्षाच्यावतीने रिधोरे तालुका माढा येथे गुरुवारी सकाळी १० वा सुमारे एक तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे रस्त्याच्या दुतर्फा गांड्याच्या रांगा लागल्या होत्या.
केंद्र सरकारच्या या शेतकरी विरोधी कायद्यामुळे शेतकऱ्यांना काही कार्पोरेट कंपन्यांचे गुलाम बनून राहावे लागेल. या कायद्यात कुठेही हमीभावाचा उल्लेख नाही.यामुळे सर्वसामान्य शेतकरी उद्ध्वस्त होतील. हा कायदा करून सरकार शेतकऱ्यांच्या जबाबदारी पासून पळ काढण्याचा प्रयत्न करीत आहे. शेतकरी हितासाठी हे कायदे रद्द करावेत.
याबरोबरच ऊस गाळप हंगाम सुरु झाला असून तालुक्यातील साखर कारखान्यांनी अद्यापही ऊस दर एफ आर पी जाहीर न करताच गाळप सुरु केले आहे. तरी कारखानदारांनी आधी ऊस दर जाहीर करावा. तसेच तालुक्यातील काही कारखान्यांनी मागील एफ आर पी ची रक्कम अद्याप दिलेली नाही. तर ऊस दर कायद्यानुसार कारखाना संचालक मंडळावर कायदेशीर गुन्हे दाखल करावेत आदी मागण्याचे निवेदन मंडल अधिकारी विजय जाधव यांना देण्यात आले. यावेळी सहा पोलिस निरीक्षक चिमणाजी केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
यावेळी स्वाभिमानी पक्ष सोलापुर जिल्हा अध्यक्ष शिवाजी भाऊ पाटील , संघटना जिल्हा कार्याध्यक्ष अजिनाथ परबतसह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.