काराळी ते तिळामळ रस्ता चौपदरीकरणास प्रारंभ
वार्ताहर /केपे
केपेच्या जनतेने चार वेळा आपल्याला निवडून दिले असून केपे मतदारसंघाचा कायापालट व्हावा या हेतूने आपण काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला आहे, असे उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांनी सागितले. ते केपे पालिका क्षेत्रातील काराळी ते तिळामळपर्यंतच्या रस्त्याच्या चौपदरीकरण कामाची सुरुवात केल्यानंतर बोलत होते. यावेळी नगराध्यक्षा सुचिता शिरवईकर, उपनगराध्यक्ष विल्यम फर्नांडिस, नगरसेवक प्रसाद फळदेसाई, अमोल काणेकर, दयेश नाईक, गणपत मोडक, दिपाली नाईक, माजी नगराध्यक्षा कायतानी फर्नांडिस, लुईझिना कार्वाल्हो व इतर हजर होते.
सुमारे 13 कोटी 30 लाख रु. खर्च करून रस्त्याचे रूंदीकरण व इतर काम केले जाईल. तसेच वीजखांबे, भूमिगत वीजवाहिन्या यांचे सुमारे 2 कोटींचे काम केले जाईल, असे कवळेकर यांनी सांगितले. विकासकामे राबवताना सदैव मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे सहकार्य लाभले आहे. 7.5 कोटी खर्च करून केपे पालिका ते दियांवपर्यंत पार्किंग व्यवस्था केली जाईल. तसेच बस स्टँड, कृषी भवन व इतर प्रकल्प येणार आहेत, असे कवळेकर यांनी सांगितले. यावेळी केपे पालिका क्षेत्रात जी विकासकामे राबवण्यात आली आहेत त्याची माहिती दयेश नाईक यांनी दिली तसेच केपेवासियांच्या विकासाकरिता कवळेकर यांनी भाजपात प्रवेश केला असल्याचे सांगितले.