भूस्खलनात अनेकांचा मृत्यू, मालमत्तेची अपरिमित हानी
तिरुवनंतपुरम / वृत्तसंस्था
केरळमध्ये परतीच्या पावसाने हाहाकार माजविला असून अनेक स्थानी भूस्खलन आणि पुरामुळे 26 जणांचा बळी गेला आहे. सर्वाधिक 13 मृत्यू कोट्टायम जिल्हय़ात झाले असून अनेक घरे कोसळली आहेत. मालमत्तेची हानी अपरिमित आहे, अशी माहिती तेथील स्थानिक प्रशासनाने दिली आहे. राष्ट्रीय आपत्तीनिवारण प्राधिकरणाने त्वरित कृती करण्यास प्रारंभ केला असून हजारो लोकांना सुरक्षित स्थळी नेण्यात यश मिळविले आहे. पुरात अडकलेल्यांना अन्न आणि औषधे पोहचविण्याचे कार्य करण्यात येत आहे. भारतीय सेनाही साहाय्यकार्य करीत आहे.
कोट्टायम जिल्हय़ातील कोट्टीकल तर इडुक्की जिल्हय़ातील कोक्कायार येथे पुराचा प्रचंड तडाखा बसला असून अनेक ठिकाणी भूमी खचली आहे. या दोन स्थानी मिळून अद्यापही 12 जण बेपत्ता आहेत. त्यांचा शोध पोलीस, राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरण आणि स्थानिक नागरिकांकडून घेतला जात आहे. रविवारी 5 मृतदेह हाती लागले असून त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही.
परिस्थिती सध्या नियंत्रणात, पण…
शुक्रवारी आणि शनिवारी राज्यात प्रचंड पर्जन्यवृष्टी झाली. त्यामुळे मोठी जीवित आणि वित्त हानी झाली. शनिवारी रात्रीपासून पावसाने विश्रांती घेतल्याने सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. तथापि, रविवारी रात्री पुन्हा पाऊस झाल्यास हानीची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे, अशी माहिती कोट्टायमच्या जिल्हाधिकारी पी. के. जयश्री यांनी दिली. आपत्ती निवारणाचे कार्य तत्परतेने करण्यावर त्यांनी भर दिला.
साहाय्यता केंद्रे स्थापन
आपत्तीग्रस्त भागांमध्ये साहाय्यता केंद्रे आणि छावण्या स्थापन करण्यात आल्या आहेत. साहाय्यता पुरवत असताना कोरोना नियमावलीचे काटेकोर पालन करण्यात यावे, अशा सूचना सर्व अधिकाऱयांना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी फेसबुकवरून दिली. माडामोन, कल्लुपारा, थुम्पामान, पुल्लाकयार, मणिक्कल, वेल्लाईकाडवू आणि अरुवीपुरम आदी भागांमध्ये अद्यापही नद्यांच्या पाण्याची पातळी वाढत असल्याची माहिती त्यांनी दिली.
अमित शहा यांची चर्चा
केरळमधील पावसाच्या स्थितीसंबंधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केरळच्या मुख्यमंत्र्यांची चर्चा केली आहे. या नैसर्गिक आपत्तीचे गांभीर्य केंद्र सरकारने समजून घेतले असून शक्य तितके सर्व साहाय्य राज्याला केले जाईल, असा शब्द दिला आहे. केंद्र सरकार परिस्थितीची सातत्याने माहिती घेत आहे आणि लक्ष ठेवीत आहे. केंद्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणाच्या अनेक तुकडय़ा पाठविण्यात आल्या असून साधनसामग्रीही पूरग्रस्त भागात पोहचविण्यात आली आहे. तिरुवनंतपुरम, कोल्लम, पथानामिथ्थीटा, कोट्टायम, अलापुझ्झा, एर्नाकुलम, इडुक्की, थ्रिसूर, पलक्कड, मल्लापुरम आणि कोझिकोड या जिल्हय़ांच्या प्रशासनांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे, असे स्पष्ट करण्यात आले.
तीन दिवस थैमान
ड गेले तीन दिवस केरळच्या बव्हंशी भागांमध्ये पाऊस-पुराचे थैमान
ड कोट्टायम जिल्हय़ात भूस्खलनात अनेक नागरिक अद्यापही बेपत्ता
ड केंद्र सरकारची आपत्तनिवारण पथके घटनास्थळी तातडीने नियुक्त
ड अनेक आपत्तीग्रस्त भागांमध्ये साहाय्यता केंद्रे आणि शिबिरे स्थापन