कोरोना महामारीत 2148 जणांवर अंत्यसंस्कार
शाहूपुरी : संगम माहुली येथे कृष्णा नदीकाठी बालाजी चॅरिटेबल ट्रस्टने उभारलेल्या कैलासस्मशानभूमीत एप्रिल ते नोव्हेंबर अखेर 2 हजार 148 जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यामध्ये कोरोना बाधित 1 हजार 089 तर इतर 1 हजार 060 मृतदेहांचा समावेश आहे. कोरोना महामारीत हा प्रकल्प जिल्हा प्रशासनासाठी संकटमोचक ठरला असून, प्रशासनाचा ताण हलका झाला.
श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे पुढील 50 वर्षांचा विचार करून 2003 मध्ये लोकसहभागातून कैलास स्मशानभूमिची उभारणी केली. त्यासाठी ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र चोरगे यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू होता. त्यांच्या अथक प्रयत्नातूनच हा प्रकल्प साकारला. कोरोना काळात या प्रकल्पाने प्रशासनाचा बराच ताण हलका केला. कोरोना काळात अंत्यसंस्कारादरम्यान वेगवेगळ्या अडीअडचणी निर्माण झाल्या होत्या. कोरोनाने जिल्ह्यातील किंवा पर जिल्ह्यातील व्यक्तीचा बळी गेल्यानंतर त्या मृतदेहावर कैलास स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
जिल्ह्यात कोरोनाने ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये मृत्यूंचे प्रमाण वाढले. मृतदेहाला हात लावायलाही कोण धजावत नव्हते. एवढेच काय अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीही द्यायला कोण तयार नव्हते. त्यावेळी कोरोनाच्या मृतांची कैलास अवहेलना होऊ नये, म्हणून दिवसातून 2 वेळा म्हणजे 8 तासानंतर कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात येत होते. यासाठी ट्रस्टने सहकार्य केले.
कोरोनाच्या संकट काळात कैलास स्मशानभूमीचा सदुपयोग झाला असून इतर जिल्ह्यात जशी कोरोनाने मृत्यू झाल्यानंतर मृत देहांची अवहेलना झाली, तशी साताऱ्यात झाली नाही, हे वास्तव आहे. जिल्हाधिकारी, नगरपालिका आणि बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सहकार्यातून हे काम स्मशानभूमीही गेले 8 महिने सुरू आहे.