● परळी खोऱ्यातील 92 वर्षीय आज्जींना घरकुलाची प्रतिक्षा
● ग्रामपंचायतींची खाती गोठवल्याने धरग्रस्तांचे हाल
अमर वांगडे / परळी :
सातारा शहराच्या पश्चिम भागात असलेले विशाल असे असलेले उरमोडी धरणाची उभारणी सुमारे 20 वर्षांपुर्वी झाली. तसेच सध्या पाण्याचा साठाही मोठय़ा प्रमाणात केला जातो मात्र धरणग्रस्तांच्या व्यथा कोणाला ही ऐकू जात नाही हिच मोठी शोकांतिका आहे. लुमणेखोल येथील 92 वर्षीय सिताबाई गणपत माने व त्यांची सुन गेल्या कित्तेक वर्ष मोडक्या घरात राहत आहे. ज्या ठिकाणी भौतिक सुविधाही नाही तसेच छप्पर हे कागदाने झाकलेले. यामुळे 92 वर्षीय आज्जी घरकुलाची प्रतिक्षा करीत आहेत. मात्र धरणग्रस्त गावांच्या ग्रामपंचायतींची खाती गोठवल्याने शासनाच्या योजना राबवता येत नसल्याने कोणी घर देत का घर? अशीच म्हणण्याची वेळ माने अज्जींवर आली आहे.
सिताबाई माने ह्या पती, दोन मुले व मोठी सुन यांच्या निधनांनंतर छोटय़ा सुनेच्या आधाराने लुमणेखोल येथे वास्तव्य करित आहेत. छोटी सुन शेतमजुरी करत दोघींचा उदर्निवाह करत आहे. मात्र पावसाळय़ात चार पत्र्याच्याच भिंती असल्यातरी छप्पर हे कागदाने झाकलेले, लाईटची सुविधा नाही, संडास नाही तसेच भागातील पावसाच्या संततधारेमुळे घरातच उफळे फुटत असतात. यामुळे अशा परिस्थिती शेजारच्यांच्या घराचा आधार घ्यावा लागत आहे. हिच दरवर्षी होणारी कसरत थांबवण्यासाठी घरकुल योजना मंजुर करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र ग्रामपंचायतींची खाती गोठवल्याने योजना कार्यन्वीत होवू शकणार नाही असल्याचे अधिकारी वर्ग सांगत आहेत.
ग्रामपंचायतीच्या बाबतचा प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित
उरमोडी धरण बाधित ग्रामपंचायतीची 2017 पासून गोठवलेली खाती पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न करत असली तरी अजूनही त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही त्यामुळे या ग्रामपंचतीमध्ये फक्त निवडणूक होते योजना राबविल्या जाऊ शकत नाही कारण निधीच उपलब्ध होत नाही. निधी नसल्याने धारणग्रस्थंची परवड होत आहे
कोमल भंडारे, लूमनेखोल सरपंच
शासकिय योजनांपासून वंचित
धरणग्रस्त 7 ग्रामपंचायतीचे व्यवहार शासनाने बंद केले आहेत. सात ग्रामपंचायती पैकी रोहोट आणि वेणेखोल अंशत: बाधित असल्याने या ग्रामपंचायतीला शासनाच्या सर्व योजनेचा लाभ मिळतो. फक्त शिल्लक नित्रळ, कासरथळ, कातवडी, लुमनेखोल, बनघर या पाच ग्रामपंचायती पुर्णपणे शासकीय लाभापासुन वंचित आहेत. त्यामुळे गरीबातील गरीब कुटुंबाची खुप ससेहोलपट होत आहे. येथे निवडणूका होतात मात्र शासनाची कोणतीच योजना लागु होत नसल्यामुळे ते पदाधिकारी फक्त नावालाच राहतात. त्यामुळेच सिताबाई गणपत माने यांच्यासारख्या अनेक कुटुंबांना शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळत नसल्यामुळे निराधार राहत आहेत.
-तुकाराम माने, लुमणेखोल ग्रामस्थ