अचूक बातमी “तरुण भारत”ची, सोमवार, 4 ऑक्टो. 2021, स. 11.00
● रविवारी रात्री अहवालात 172 बाधित
● एकूण 4,132 जणांची तपासणी
● जिल्ह्यात पाचवी ते बारावीचे वर्ग सुरू
● जगरहाटीला आली गती
● हमीपत्र घेऊन भरवल्या शाळा
सातारा / प्रतिनिधी :
ऑक्टोबर महिन्याच्या आरंभापासून बाधित वाढीचा वेग मंदावलेला असला तरी तो दीडशे ते दोनशेच्या दरम्यान स्थिर आहे. मात्र गेल्या चार दिवसांपासून बाधीतवाढ 200 च्या खाली राहिल्याचा दिलासा असून, गुरुवारी 198, शुक्रवारी 183, आणि शनिवारी 175 व रविवारी रात्रीच्या अहवालात 172 जणांचा अहवाल बागितला असून अशाप्रकारे सलग चौथ्या दिवशी बाधित वाढ 200 च्या खाली राहिल्याचा दिलासा या स्थितीत लाभलेला आहे. अल्प वाढतही सातारा, फलटण व खटाव या तालुक्यांमध्ये दोन अंकी संख्येने वाढ सुरूच असून अल्प वाढीतही हे तालुके हॉटस्पॉट ठरलेले आहेत. मात्र इतर सात तालुके कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहेत.
रविवारी रात्री अहवालात 175 बाधित
रविवारी रात्री आलेल्या अहवालात एकूण 4 हजार 132 जणांची तपासणी झालेली असून यामध्ये 172 जणांचा अहवाल बाधित आला असल्याची माहिती प्रशासनाने दिलेली आहे. यामध्ये जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर 2.9 टक्के एवढा खाली राहिलेला आहे. बाधित वाढीचा आलेख खाली दिसत असला तरी तो ज्या पद्धतीने स्थिर राहत आहे. त्यासाठी अद्यापही जिल्हावासीयांना काळजी घ्यावी लागणार आहे.
जिल्ह्यात शाळांच्या घंटा खणाणल्या
गत दीड वर्षापासून कोरोना संसर्ग मध्ये शाळा महाविद्यालय बंद होत्या. शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्यातील शाळा, महाविद्यालये नावाचा मोठा दुवा कुलूपबंद झाल्याने आणि युवा पिढी आणि विद्यार्थी घरीच असल्याने एक वेगळी सामाजिक समस्या निर्माण होऊ पाहत होती. ज्या वयात खेळायचे, बागडायचे, शिकायचं त्याच वयात घरात बसण्याची पाळी कोरोनाने जगावर आणली. मात्र यामध्ये एका पिढीचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. आता कोरोनाच्या भीतीवर मात करून शाळा सुरू करण्यात आल्याने जिल्ह्यातील शाळांच्या घंटा पुन्हा खणाणल्या आहेत. यामुळे जिल्हाभरातील शाळांचे महाविद्यालयांचे परिसर गजबजून गेले होते.
हमीपत्र घेऊन शाळा भरवल्या
राज्य शासनाने जिल्ह्यात शहरी भागात आठवी ते बारावी पर्यंतचे वर्ग आणि ग्रामीण भागात पाचवी ते दहावीपर्यंतचे वर्ग भरवण्यास परवानगी दिली मात्र विद्यार्थ्यांना शाळेत येताना पालकांचे हमीपत्र भरून द्यावे लागले आहे. कोरोना पासून वाचण्यासााठी मास्क, सॅनिटायझरचा वापर, सुरक्षित सामाजिक अन्तर या गोष्टी काही दिवस पाळत लागणार आहेत. हे आता आबालवृद्धांना ज्ञात आहे मात्र राज्य शासनाने पालकांकडून हमीपत्र लिहून घेत स्वतःवर ची जबाबदारी टाळली आहे ती अत्यंत चुकीची असल्याचे पालकांचे मत आहे. शेवटी घरात किती दिवस बसून येणाऱ्या पिढ्यांचं नुकसान करणार आहोत याचेही भान असायला हवे होते.
जिल्हाभरात जगरहाटीला आली गती
जिल्ह्यात आणि लोक नंतर जवळपास सर्व काही गोष्टी सुरू झालेले आहेत त्यामध्ये काहींना वेळेची बंधने अद्यापि लागू असले तरी एकूणच जगरहाटीला गती आली असून आता शाळा महाविद्यालय सुरू झाल्याने त्या अनुषंगाने गर्दीही वाढणारच आहे. गणेशोत्सवापासून कोरोना संसर्ग कमी होत गेला असून सध्या ऑक्टोबर हीट वाढल्याने बदलत्या वातावरणास तोंड देत सर्वांचे जगणे सुरू आहे. यामध्ये कोरोना संसर्ग मंदावत असल्याचा मोठा दिलासा जिल्ह्याला लाभला असून जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी देखील आरोग्य विभागाने इतर आजारांवर लक्ष केंद्रित करून लोकांच्याया मनातील भीती कमी करावी असा सल्ला दिलेला आहे.
रविवारपर्यंत जिल्ह्यात
एकूण नमुने 21,00,091
एकूण बाधित 2,48,921
एकूण कोरोनामुक्त 2,39,763
मृत्यू 6091
उपचारार्थ रुग्ण 5,520
रविवारी जिल्हय़ात
बाधित 175
मुक्त 52
मृत्यू 02