प्रतिनिधी/ नवारस्ता
संततधार कोसळणाऱया मुसळधार पावसामुळे कोयना पाणलोट क्षेत्रात अक्षरशः हाहाकार केला आहे. गेल्या चोवीस तासांत धरणात प्रतिसेकंद 67 हजार 696 क्युसेक पाण्याची आवक सुरु झाली आहे. धरणातील पाणीसाठा 91.10 टीएमसी झाला असून पाणलोट क्षेत्रात अद्याप ही पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे धरणाची पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी रविवारी सकाळी साडे आठ वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे 4 फूट, सकाळी 11 वाजता 6 फूट आणि त्यानंतर दुपारी 2 वाजता पुन्हा 7 फूट आणि चार वाजता 10 फूट उचलून कोयनानदी पात्रात प्रतिसेकंद 54 हजार 246 क्यूसेक वेगाने विसर्ग सुरू करण्यात आला. यावेळी कोयना सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
कोयना पाणलोट क्षेत्रात गेल्या आठ दिवसांपासून मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरु असून गेल्या चोवीस तासांपासून तर पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सुरु आहे. गेल्या चोवीस तासांत धरणाच्या पाणीसाठय़ात तब्बल साडे सहा टीएमसी इतक्या विक्रमी पाण्याची आवक झाली असल्याने रविवारी सकाळपर्यंत धरणातील पाणीसाठा 90 टीएमसी झाला होता.
दरम्यान, धरणातील पाणी पातळी नियंत्रणासाठी धरणाच्या पायथा विजगृहातून 2100 क्युसेक पाण्याचा विसर्ग शुक्रवारपासून सुरु करण्यात आला होता. मात्र पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढतच असल्यामुळे आणि भविष्यात आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये यासाठी आणि कोयना धरणाच्या पाणीपातळीची निर्धारित लेव्हल ठेवण्यासाठी धरणातून पाण्याचा विसर्ग करणेचा निर्णय कोयना जलसिंचन विभागाने घेतला आणि त्यानुसार शनिवार दि. 14 रोजी दुपारी 2 वाजून 01 मिनिटांनी धरणाचे सहा वक्र दरवाजे 1.9 फुटांनी उचलून कोयना नदीपात्रात प्रतिसेकंद 11 हजार 427 क्युसेक वेगाने कोयना पात्रात पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्यानंतर पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने रविवारी सकाळी साडे आठ वाजता पुन्हा सहा वक्र दरवाजे 4 फुटांवर उचलून कोयना नदीपात्रात 25 हजार 604 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु करणेत आला.
दरम्यान, सकाळी आठ वाजल्यापासून धरणाच्या पायथा विजगृहातून प्रतिसेकंद 2100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु असतानाच पुन्हा धरणाच्या सहा वक्र दरवाजे 6 फूट उचलून कोयना नदीपात्रात प्रतिसेकंद 33 हजार 732 क्यूसेक आणि पायथा विजगृहातून 2100 क्युसेक असे मिळून एकूण कोयना नदीपात्रात तब्बल 35 हजार 622 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. तरीही पावसाचा जोर वाढतच असल्यामुळे रविवारी दुपारी 2 वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे आणखी एक फूट उचलून 7 फूटावर उचलण्यात आले. मात्र त्यानंतर हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱयामुळे सायंकाळी 4 वाजता धरणाचे दरवाजे उचलून प्रतिसेकंद 52 हजार 146 क्यूसेक आणि पायथा विजगृहातून 2100 क्यूसेक असे एकूण 54 हजार 246 क्यूसेक वेगाने कोयना नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला.
मुसळधार पाऊस आणि विसर्ग यामुळे कोयना नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. परिणामी कोयना व कृष्णा नद्यांची पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाल्याने कोयना आणि कृष्णा नदीला महापुराचे स्वरूप निर्माण झाले आहे. कोयना नदीवरील पाटण शहराशी जोडणारा मुळगाव पूल, संगमनगर धक्का जुना पूल आणि निसरे फरशी पूल पाण्याखाली गेले आहेत. कोयना नदीला महापुराचे स्वरूप आल्याने कृष्णा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाल्याने प्रशासनाने कोयना कृष्णा नदीकाठच्या गावांना अलर्ट जारी केला आहे.
दरम्यान, रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत कोयनानगर येथे 182 मिलिमीटर, नवजा येथे 324 मिलिमीटर तर महाबळेश्वर येथे 203 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे तर सायंकाळी पाच वाजेपर्यंत धरणात प्रतिसेकंद 59 हजार 258 क्युसेक इतक्या प्रचंड पाण्याची आवक सुरु होती. धरणाची पाणीपातळी 2152.06 फूट झाली असून धरणातील पाणीसाठा 91.10 टीएमसी इतका झाला आहे. दरम्यान, कोयना पाणलोट क्षेत्रात रविवारी सायंकाळनंतर ही पावसाचा जोर कायम होता.
तर धरणाचे दरवाजे आणखी उचलावे लागतील…!
सद्या कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढत असून धरणात सध्या 86 टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणातील पाणीपातळी नियंत्रणासाठी धरणाचे सहा वक्र दरवाजे उचलून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. पावसाचे प्रमाण असेच राहिल्यास कोयना धरण निर्धारित वेळेत पूर्ण क्षमतेने भरेल असा विश्वास व्यक्त करून येत्या चोवीस तासांत पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर आणखी वाढल्यास धरणाचे दरवाजे आणखी वर उचलून विसर्ग वाढविण्यात येऊ शकतो मात्र पावसाचा जोर कमी झाल्यास धरणातील विसर्ग कमी ही केला जावू शकतो अशी माहिती कोयना जलसिंचन विभागाने व्यक्त केला.
असे पोहचणार पाणी..!
कोयना धरणातून विसर्ग झाल्यानंतर पुराचे पाणी पाटणला 6 ते 8 तासांनी पोहचते. कराडला 16 ते 18 तासांनी तर सांगलीला 28 ते 30 तासांनी पोहचते. थ्यामुळे 2 वाजता कोयना धरणातून सोडलेले पाणी पाटणला रात्री 7 ते 9 वाजेपर्यत कराडला सोमवारी दुपारी पहाटे 11 ते 12 वाजेपर्यंत तर सांगलीला मंगळवारी रात्री सकाळी 9 वाजता पोहचू शकते.
पाटण तालुक्यातील जनजीवन विस्कळीत
कोयना पाणलोट क्षेत्रासहित संपूर्ण पाटण तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू असून कोयना धरणातील विसर्गामुळे कोयना नदीला महापुराचे स्वरूप आले आहे. परिणामी नदीकाठच्या पाटण, मंद्रुळ हवेली, नावडी या गावांतील शेतात पाणी शिरले असून मुळगाव पुलावर पाणी आल्यामुळे नदीपलीकडील गावांचा पाटणशी संपर्क तुटला आहे. परिणामी तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पाटणमध्ये सद्या स्मशानभूमीला पाणी लागले आहे. ही परिस्थिती अशीच राहिल्यास पाटण शहरासहित अनेक गावांना धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अतिवृष्टीच्या इशाऱयाने पुन्हा विसर्ग वाढविला
सध्या कोयना धरणामध्ये 91.10 टीएमसी पाणीसाठा आहे. हवामान खात्याकडून पुढील दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा प्राप्त झाला आहे. पाणीपातळी नियंत्रित ठेवणेसाठी सध्या 41191 क्यूसेक असलेल्या विसर्गात वाढ करून संध्याकाळी 4.00 वाजता एकूण विसर्ग 55000 हजार करण्यात येत आहे तरी कोयना व कृष्णा नदीकाठच्या सर्वांनी कृपया दक्षता घ्यावी, अशी माहिती कोयना सिंचन विभागाने दिली.