सहा महिन्यांत 1 लाख 38 हजार जणांचा प्रवास
प्रतिनिधी /बेळगाव
कोरोनाच्या दुसऱया लाटेत प्रवाशांची संख्या कमी झाली. रेल्वे, बस व विमान प्रवासही मंदावल्याचे चित्र देशभर दिसत होते. परंतु याला अपवाद ठरले आहे ते बेळगावचे सांबरा विमानतळ. मागील सहा महिन्यांमध्ये 1 लाख 38 हजार जणांनी विमानप्रवास केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे प्रवासी संख्येत राज्यात तिसऱया क्रमांकाचे विमानतळ ठरले आहे. पहिल्या दोन क्रमांकावर असलेली विमानतळे ही आंतरराष्ट्रीय दर्जाची आहेत. त्यांच्या खालोखाल बेळगाव विमानतळ राज्यात अव्वल ठरले आहे.
बेळगावमधून देशातील महत्त्वाच्या शहरांना विमानसेवा दिली जाते. यामुळे पश्चिम महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक व कोकणातील अनेक प्रवासी बेळगावमध्ये येऊन पुढील प्रवास करतात. बेळगाव विमानतळावरील अनेक मार्ग हे उडान-3 अंतर्गत मंजूर असल्याने तिकीट दरही अत्यंत कमी आहे. त्यामुळे प्रवाशांची पहिली पसंती बेळगावला असते. शेजारी असणाऱया हुबळी विमानतळापेक्षा दुप्पट प्रवासी बेळगावमधून विमानप्रवास करीत आहेत.
यावषी एप्रिल महिन्यात आलेल्या कोरोनाच्या दुसऱया लाटेमुळे प्रवाशांची संख्या हळूहळू कमी झाली. त्यानंतर इतर राज्यांमध्ये प्रवास करण्यासाठी आरटीपीसीआरची सक्ती करण्यात आल्याने प्रवाशांची संख्या मंदावली होती. त्यामुळेच मे महिन्यात केवळ 11 हजार प्रवाशांनी विमानप्रवास केला. परंतु त्यानंतर जून व जुलै महिन्यापासून प्रवाशांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा 40 हजार प्रवासी संख्येचा टप्पा गाठला जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
ऑगस्ट महिन्यात होणार वाढ
या महिन्यात स्पाईस जेटने दिल्ली व बेंगळूर या विमानफेऱया सुरू केल्या आहेत. या दोन्ही फेऱयांना उत्तम प्रतिसाद मिळू लागल्याने प्रवासी संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. दिल्लीच्या प्रत्येक फेरीला 200 हून अधिक प्रवासी प्रयाण करीत असल्याने ऑगस्ट महिन्यातील प्रवासी संख्येत वाढ होत आहे.
मागील सहा महिन्यांतील विमान प्रवाशांची संख्या
महिना | प्रवासी संख्या | विमानांची ये-जा |
फेबुवारी | 34,940 | 662 |
मार्च | 30819 | 744 |
एप्रिल | 21,899 | 636 |
मे | 11,271 | 492 |
जून | 18,020 | 512 |
जुलै | 21881 | 618 |