पंतप्रधानांकडून कौतुक : गुजरातमधील राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठाच्या नव्या इमारतीचे लोकार्पण
गांधीनगर / वृत्तसंस्था
कोरोनाच्या काळात पोलिसांनी लोकांना केवळ संरक्षणच दिले नाही, तर भुकेल्यांना अन्न आणि औषधे पोहोचवून आपल्यातील माणुसकीची भावना दाखवून दिल्याचे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी येथे काढले. चार राज्यांतील बंपर विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या गुजरात दौऱयावर आहेत. पंतप्रधानांच्या गुजरात दौऱयाचा शनिवारी दुसरा दिवस होता. याचदरम्यान त्यांनी गांधीनगरमध्ये राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन व लोकार्पण केले. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील उपस्थित होते.
राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठात येणे ही माझ्यासाठी विशेष आनंदाची घटना आहे. देशभरातील संरक्षण क्षेत्रात आपले करिअर घडवू इच्छिणाऱयांसाठी या विद्यापीठामुळे नवीन संधी निर्माण होणार आहेत. एकविसाव्या शतकात संरक्षण क्षेत्रात येणाऱया आव्हानांच्या अनुषंगाने आपल्या व्यवस्थेच्या विकासासाठी आणि त्या यंत्रणा हाताळणाऱया व्यक्तिमत्त्वाच्या विकासासाठी या विद्यापीठाचा जन्म झाला आहे. राष्ट्रीय रक्षाशक्ती विद्यापीठ हे असेच एक क्षेत्र आहे, जे देशभरात संरक्षण क्षेत्रात आपले करिअर घडविणाऱयांना संधी देईल. डीवायएसपी, पीएसआय आणि कॉन्स्टेबल बनू इच्छिणाऱया तरुणांना त्या दर्जाचे व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाईल. सद्यस्थितीत ‘वेल टेन्ड मॅनपॉवर’ ही देशाची सर्वात मोठी गरज असल्याचे प्रतिपादन पंतप्रधानांनी केले. यादरम्यान 37 विद्यार्थ्यांना सुवर्णपदके आणि 14 विद्यार्थ्यांना डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली.
प्रशिक्षणात बदलाची गरज
सर्वसामान्यांना पोलिसांची मैत्री आणि विश्वासाचा अनुभव यावा यासाठी प्रशिक्षण पद्धत बदलण्याची गरज आहे. त्यामुळे रक्षाशक्ती विद्यापीठाचा देशभरात विस्तार होणार आहे. आपल्या देशात सहसा पोलिसांचे वेगळे चित्र मांडले जाते. चित्रपट असो वा प्रसारमाध्यमे, पोलिसांच्या प्रतिमेचे खरे सत्य समाजापर्यंत पोहोचत नाही, अशी खंतही पंतप्रधानांनी बोलून दाखवली.
अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे गुन्हेगारांना पकडण्यात मदत होत आहे. अशा परिस्थितीत सुरक्षा कर्मचाऱयांना योग्य शस्त्रे आणि आधुनिक उपकरणांचे प्रशिक्षण देण्याची गरज आहे. आता नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने केसेस सोडवल्या जातात. एवढेच नाही तर अपंग बंधू-भगिनींनी संरक्षणशक्तीचे प्रशिक्षण घेतल्यास ते संरक्षण क्षेत्रातही मोठे योगदान देऊ शकतात, असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधानांच्या प्रयत्नामुळे सुरक्षा यंत्रणा बळकट
विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी 2002 ते 2013 या काळात गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि त्यावेळी त्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेकडे नव्या दृष्टीने बघायला सुरुवात केली. त्यांनी संपूर्ण पोलीस विभागाचे आधुनिकीकरण करतानाच नवे सॉफ्टवेअर तयार केले. तसेच राष्ट्रीय कायदा विद्यापीठ, गुजरात फॉरेन्सिक विद्यापीठ आणि रक्षाशक्ती विद्यापीठ या तीन विद्यापीठांची स्थापना केली असून येथे कायदा आणि सुव्यवस्थेशी संबंधित तिन्ही विद्याशाखांना त्यात करिअर करण्याची सुविधा मिळाली आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले. तसेच आता हे विद्यापीठ राष्ट्रीय स्तरावर वेगाने काम करण्यात नावलौकिक कमावेल असे त्यांनी सांगितले.