ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
सध्या देशात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः हाहाकार माजविला आहे. या पार्श्वभूमीवर रिझर्व बँक ऑफ इंडियाकडून (आरबीआय) एक मोठी घोषणा केली आहे. याबाबत आरबीआयचे गव्हर्नर शशिकांत दास यांनी बुधवारी पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली.
शशिकांत दास म्हणाले, रिझर्व बँक कोरोनाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. पुढे ते म्हणाले जगाच्या तुलनेत भारतात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे. परंतु पहिल्या लाटेपेक्षा कोरोनाची दुसरी लाट अधिक भीतीदायक आहे.
पुढे ते म्हणाले, पहिल्या लाटेनंतर अर्थव्यवस्थेत देखील चांगली वाढ दिसत आहे. दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी बँकेकडून 21 मार्च 2022 पर्यंत रुग्णालये, ऑक्सीजन, लस आयात करणे तसेच कोविडची औषधे यासाठी 50 हजार कोटींची मदत दिली जाणार आहे. यासाठी रेपो दराने बँकांना हा निधी पुढील तीन वर्षांसाठी उपलब्ध होईल. या विशेष खिडकीची सुविधा 31 मार्च 2022 पर्यंत सुरु राहणार असल्याचे दास यांनी स्पष्ट केले.
आज बँकेने अतिरिक्त रोकड उपलब्ध करणे, वैयक्तिक कर्जदार आणि उद्योजकांसाठी कर्जपुनर्रचनेचा पर्याय, राज्यांना अतिरिक्त कर्जाचा पर्याय उपलब्ध करण्यात आला. यासोबतच केवायसीबाबत बँकेने मोठी सूट देत व्हिडिओ केवायसी आणि नॉन फेस टू फेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला चालना देण्यासाठी सांगितले आहे.
पुढे ते म्हणाले, बँकांना कोविड लोन बुक तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या सोबतच प्राथमिक क्षेत्रासाठी इन्सेन्टीव्हची तरतुद केली जाणार आहे. तसेच आरबीआयने पहिल्यांदा या संधीचा लाभ न घेतल्यास 25 कोटी रुपयांपर्यंत कर्ज घेणारे व्यक्तिगत, छोट्या व्यावसायिकांना कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी दुसरी संधी दिली आहे.
पुढे ते म्हणाले, 35 हजार कोटी रुपयांच्या गव्हर्मेंट सिक्युरिटीजच्या खरेदीचा दुसरा टप्पा 20 मे पासून सुरू होणार आहे.
तसेच राज्यांना ओव्हरड्राफ्टची सुविधा दिली जाणार आहे. ओव्हरड्राफ्ट सुविधेचा कालावधी आता 50 दिवस केला आहे. यापूर्वी हा कालावधी 36 दिवसांचा होता. 30 सप्टेंबर 2021 पर्यंत ही सुविधा राज्य सरकारांना घेता येणार आहे.
बँकेने 10 हजार कोटी रुपयांपर्यंत स्मॉल फायनान्स बँकांसाठी दीर्घ काळासाठी रेपो ऑपरेशन (TLTRO) ची घोषणा केली आहे.