ऑनलाईन टीम / देहरादून :
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी उत्तराखंड सरकारने राज्यातील कर्फ्यू आणखी एक आठवडा म्हणजेच 31 ऑगस्टपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता 31 ऑगस्टच्या सकाळी सहा वाजेपर्यंत राज्यात कोरोना कर्फ्यू लागू असणार आहे. खरे तर राज्यातील कोरोना रूग्णांच्या संख्येत लक्षणीय घट होताना दिसत आहे. तरी देखील सरकारने पाहिले निर्बंध कायम ठेवले आहेत.
नव्या आदेशानुसार, 24 ऑगस्टच्या सकाळी 6 वाजल्यापासून ते 31 ऑगस्टच्या सकाळी 6 वाजेपर्यंत कर्फ्यू कायम असणार आहे. या काळात लसीकरणाचे काम सुरु असणार आहे. तसेच आदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, बाहेरील राज्यातून येणाऱ्या नागरिकांनी जर लसीचे दोन डोस घेतले नसतील तर त्यांना 72 तासांपूर्वीची आरटीपीसीआर, ट्रूनेट किंवा एंटीजन टेस्ट निगेटीव्ह असेल तरच राज्यात प्रवेश दिला जाईल.
यासोबतच आदेशात म्हटले आहे की, व्यापारीक प्रतिष्ठान पाहिल्याप्रमाणेच सकाळी 8 ते रात्री 9 वाजपर्यंत सुरू असतील. तर हॉटेल आणि रेस्टॉरंट 50 टक्के क्षमतेनुसार उघडले जातील. लग्न समारंभात अजूनही केवळ 50 नागरिकांनाच प्रवेश दिला जाणार आहे. तसेच ज्यांची 72 तासांपूर्वीची आरटीपीसीआर टेस्ट निगेटीव्ह आहे अशा नागरिकांनाच यामध्ये सहभागी होण्यास परवानगी देण्यात आली आहे.
दरम्यान, महाराष्ट्राला देखील कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका वाढण्याची शक्यता आहे. आहे, या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार आता सणासुदीच्या काळात पुन्हा एकदा निर्बंध लागू करते की काय? याबाबत काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.