संसर्गाचा धोका वाढला : काळजी घेण्याची गरज,2668 जण झाले बरे, दोन दिवसांत तब्बल 35 बळी,निर्बंधांची अंमलबजावणी नाही.चेकनाक्यांवरही सावळ गोंधळ
प्रतिनिधी /पणजी
तिसऱया कोरोना लाटेतील सर्वाधिक 20 बळी गेल्या 24 तासात म्हणजे काल शुक्रवारी नोंदवण्यात आले असून पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढल्याचे समोर आले आहे. दिवसभरात 1322 नवीन रुग्ण सापडले असून 2668 जण बरे झाल्याची माहिती आयोग्य खात्याने दिली आहे. एकूण 54 रुग्णांना हॉस्पिटलात भरती करण्यात आले असून 43 जणांना घरी पाठवण्यात आले आहे. एकूण 4649 जणांचे नमुने तपासण्यात आले आणि त्यापैकी 1322 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह मिळाले असून त्यातील 1268 जणांना होम आयसोलेशन देण्यात आले आहे. सक्रीय कोरोना रुग्णांची संख्य 11903 एवढी झाली असून मृतांची संख्या 3665 वर पोहोचली आहे.
कोरोनाचे रुग्ण कमी किंवा जास्त होत असून संसर्ग वाढत आहे. कोरोनामुळे बळी देखील वाढत असल्याने पुन्हा एकदा चिंता करण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.
दोन दिवसांत तब्बल 35 बळी
राज्यात सुरुवातीपासून आतापर्यंत मिळून 2,36,361 जणांना कोरोनाची लागण झाली. त्यातील 2,20,793 जण बरे झाले. गेल्या दोन दिवसात 35 जणांचे बळी गेले असून अचानक बळी वाढल्याने भिती पुन्हा एकदा वाढत आहे.
सध्या कोरोनाकडे कोणाचेच लक्ष नाही सरकारचे तर नाहीच नाही कारण सर्वजण निवडणुकीच्या धामधुमीत मग्न आहेत. कोरोनाकडे लक्ष देण्यास वेळच मिळत नसल्याची अनेकांची तक्रार असल्याचे सांगण्यात आले.
गर्दीवरील निर्बंधांची अंमलबजावणी नाही
नवीन वर्ष 2022 सुरू झाल्यापासून गोव्यात कोरोनाचे बळी वाढत असून ते कमी होण्याची लक्षणे सध्या तरी दिसत नाही. निवडणुकीच्या निमित्ताने लहान सभा, बैठका होत असून प्रचारासाठी उमेदवार त्यांचे कार्यकर्ते गटागटाने फिरत आहेत. त्यासाठी संख्येवर बंधने घालण्यात आली असली तरी गर्दी होत असल्याचे चित्र आहे. अर्ज दाखल करण्यासाठी, देवदर्शन घेण्यासाठी उमेदवार, कार्यकर्ते गर्दी करीत असून तेथे होणाऱया गर्दीची तपासणी करण्यासाठी यंत्रणाच नाही. काही ठिकाणी विरोधी पक्षीय उमेदवारांची अडवणूक होते परंतु सत्ताधारी पक्षीय उमेदवारांना गर्दीला कोणी अडवत नसल्याचे दिसून येते त्याचाच परिणाम म्हाणून कोरोनाचे बळी वाढत आहेत.
सीमा चेकनाक्यांवरही सावळ गोंधळ
मास्कशिवाय अनेक लोक फिरत असून सॅनिटायझर वापर होत नाही तसेच सामाजिक अंतरही पाळले जात नाही. शिवाय गोव्याच्या सीमा पर्यटक, प्रवासी व ये-जा करण्यासाठी खुल्या असून तेथेही फारशी तपासणी होत नसल्याचे समोर आले आहे. त्याचाही परिणाम होऊन कोरोनाचे रुग्ण वाढत असावेत असा अंदाज आहे.
बळींची संख्या वाढल्याने कोरोना रुग्ण त्यांचे नातेवाईक घाबरून गेले असून काय करावे, करू नये अशी चिंता त्यांना सतावत आहे. सर्व मंत्री प्रचारात, निवडणुकीत गुंतले असल्याने या कोरोना परिस्थितीकडे कोण ढुंकूनही पहायला तयार नाही.