प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनासंदर्भात कोणत्याही जाती, धर्म किंवा समुदायाविरोधात खोटी व प्रक्षोभक माहिती प्रसारित करणाऱयाविरूद्ध कठोर कारवाई हाती घेण्यात येईल, असा इशारा उत्तर विभागाचे आयजीपी एच. जी. राघवेंद्र सुहास यांनी दिला आहे. मंगळवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सर्वांनीच जबाबदारीने वागण्याची सूचनाही केली.
कोरोना विषाणू हा कोणत्याही जाती किंवा धर्मापुरता मर्यादीत नसून एका व्यक्तीद्वारे अनेकांमध्ये या विषाणूचा फैलाव होत आहे. यामुळे सर्वांनीच खबरदारी बाळगणे गरजेचे आहे. सुरक्षित अंतर ठेवण्याबरोबरच सरकारने दिलेल्या नियमांचे पालन करून कोरोना विषाणूंचा फैलाव रोखण्याचे काम सर्वांनीच करावे आणि प्रशासनास सहकार्य करावे, अशी विनंती आयजीपी एच. जी. राघवेंद्र सुहास यांनी यावेळी केली. वैद्य मंडळी, आरोग्य खात्याचे अधिकारी व कर्मचारी, पोलीस खाते यांच्यावतीने दिवसरात्र कार्य सुरू आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्याच्यादृष्टीने या सर्वांचीच धडपड सुरू आहे. यामुळे त्यांच्या सेवेची दखल घेऊन त्यांना पाठबळ देण्याची गरज आहे. त्यांच्याशी सौहार्दतेने वागणेही आवश्यक आहे. घरामध्येच राहून विषाणूचा फैलाव रोखण्याबाबत जागृती करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
कोरोनासंदर्भात कोणत्याही जाती धर्म, आणि समुदायाविरोधात सोशल मीडियाद्वारे खोटी माहिती पसरविणे, प्रक्षोभक लिखाण करणे असे प्रकार करणाऱयांविरूद्ध कठोर कारवाई हाती घ्यावी लागणार असल्याचे आयजीपी एच. जी. राघवेंद्र सुहास यांनी यावेळी सांगितले.