ऑनलाईन टीम / मुंबई :
अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. मात्र, त्यानंतर यूजीसीने सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांच्या परीक्षा घ्या अशा सूचना महाराष्ट्र सरकारला दिल्या आहेत. त्यामुळे आता विद्यार्थ्याच्या मनाता गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. मात्र, राज्य सरकार परीक्षा न घेण्याच्या निर्णयावर ठाम आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी बुधवारी दिली.
ते म्हणाले, यूजीसीने घेतलेला निर्णय हा विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणारा आहे. त्यामुळे कोरोना काळात राज्य सरकार परीक्षा घेऊ शकत नाही. तसेच एखादा विद्यार्थी कोरोनाग्रस्त झाला तर त्याला जबाबदार कोण? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
विद्यार्थ्यांकडून अंतिम परीक्षेवरुन राजकारण सूरु असल्याचा आरोप होत आहे. यावरुन विद्यार्थ्यांमध्ये असंतोषही वाढला आहे. हाच मुद्दा धरून उदय सामंत यांनी यूजीसीला पत्र पाठवून आपली भूमिका स्पष्ट केली.
ते म्हणाले, महाराष्टातील कोरोनाची परिस्थिती पाहता सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेणे शक्य नाही, असे म्हटले आहे. तसेच या निर्णयाचा संबंध थेट विद्यार्थ्यांच्या जीवाशी आहे, त्यामुळे यूजीसीने पुनर्विचार करावा असे म्हटले आहे.