राज्यात कोरोना संसर्ग वाढल्याने सरकारचा निर्णय: विकेंड कर्फ्यू, नाईट कर्फ्यूही वाढणार
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे राज्य सरकारने सध्या जारी असणारी कोविड मार्गसूची 31 जानेवारीपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विकेंड कर्फ्यू आणि नाईट कर्फ्यूसह विविध प्रकारचे निर्बंध या महिन्याच्या अखेरपर्यंत लागू राहणार आहेत. मंगळवारी रात्री सरकारने यासंबंधी सुधारित मार्गसूची जारी केली आहे. खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला असून राज्यात लॉकडाऊन जारी होणार असल्याच्या अफवांना राज्य सरकारने पूर्णविराम दिला आहे.
राज्यातील कोरोना स्थितीविषयी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी मंत्री आणि अधिकाऱयांसमवेत बेंगळूरमध्ये मंगळवारी सायंकाळी बैठक घेतली. मुख्यमंत्री बोम्माई स्वतः कोरोनाबाधित असल्यामुळे ते या बैठकीत व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सहभागी झाले होते. बेंगळूरमध्ये कोरोनाचा फैलाव वेगाने होत असल्यामुळे येथे आणखी कडक नियम लागू करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सामाजिक अंतर आणि मास्कचा वापर सक्तीचा करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला आहे.
सार्वजनिक ठिकाणी म्हणजेच हॉटेल, बार-रेस्टॉरंट, चित्रपटगृहे या ठिकाणी क्षमतेच्या 50 टक्के ग्राहकांनाच प्रवेश देण्याचा आदेश यापूर्वी 19 जानेवारीपर्यंत जारी करण्यात आला होता. हा आदेश आता जानेवारीअखेरपर्यंत लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची सूचना जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुखांना देण्यात आली.
शिवाय सध्या जारी असलेल्या मार्गसूचीप्रमाणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने यावर निर्बंध या महिन्याच्या अखेरपर्यंत राहणार आहेत. विवाहांमधील उपस्थितीसाठी निश्चित केलेली कमाल मर्यादेचे उल्लंघन होणार नाही, याकडे स्थानिक प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी सूचना करण्यात आली आहे. नाईट कर्फ्यूला देखील दुसऱयांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. या कालावधीत अत्यावश्यक सेवांनाच मुभा असणार आहे.
कोरोनाच्या तिसऱया लाटेमध्ये अधिकजण होम आयसोलेशन आहेत. त्यांच्या आरोग्याची नियमित तपासणी, औषधांचे किट वितरणात गोंधळ होणार नाही, याकडे आरोग्य विभागाने लक्ष द्यावे. कोविड चाचण्यांचे प्रमाण वाढविणे तसेच पॉझिटिव्ह अहवाल आल्यास त्वरित बाधितासंबंधी निर्णय घेऊन त्याला होम आयसोलेशन करावे की इस्पितळात दाखल करावे, यासंबंधीचा निर्णय घ्यावा, अशी सूचना आरोग्य खात्याने दिली आहे.
कोणत्याही प्रकारचे सार्वजनिक मेळावे होणार नाहीत, याबाबत खबरदारी स्थानिक प्रशासनाने घ्यावी. बाजारपेठेतील गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना करणे, कोरोना मार्गसूचीच्या अंमलबजावणीत कोणत्याही प्रकारची कसर राहणार नाही, यावर लक्ष केंद्रीत करण्याची सूचनाही प्रशासनांना मुख्यमंत्री बोम्माई यांनी दिली.
शेजारील राज्यांमध्ये कोरोना संसर्ग वेगाने वाढत असल्यामुळे कर्नाटकाच्या सीमेवर अधिक खबरदारी घेतली जात आहे. गोवा, महाराष्ट्र आणि केरळ राज्यांतून कर्नाटकात येणाऱयांना यापुढे देखील आरटीपीसीआर सक्ती करण्यात आली आहे. 4 जानेवारी रोजी राज्य सरकारने जारी केलेला आदेश 19 जानेवारीपर्यंत लागू केला होता. त्याची मुदत आणखी दोन आठवडय़ांनी वाढविण्यात आली आहे.
संक्रांती, वैकुंठ एकादशीसाठी स्वतंत्र मार्गसूची
मकर संक्रांती आणि वैकुंठ एकादशी या सणांच्या वेळी कोरोना संसर्ग आणखी वाढू नये याकरिता राज्य सरकारचे मुख्य सचिव पी. रवीकुमार यांनी यासंबंधीची मार्गसूची जारी केली आहे. त्यानुसार संक्रांती आणि वैकुंठ एकादशीवेळी मंदिरांच्या प्रथेनुसार पूजा करण्यास परवानगी असणार आहे. मात्र, या काळात उत्सव, मनोरंजनपर कार्यक्रमाचे आयोजन, मिरवणूक काढण्यावर निर्बंध असणार आहेत. शिवाय या दिवशी मंदिरांमध्ये एका वेळी 50 पेक्षा अधिक जणांना प्रवेश देऊ नये. शिवाय मंदिरांमध्ये दर्शनासाठी जाणाऱयांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेले असावेत, अशी अट घालण्यात आली आहे.
मुलांच्या हितासाठी….
विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होण्याची प्रकरणे वाढल्यामुळे गटशिक्षणाधिकारी आणि तालुका आरोग्याधिकाऱयांनी दिलेल्या अहवालाच्या आधारे शाळा बंद ठेवण्याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱयांना देण्यात आला आहे. तालुका आणि जिल्हा इस्पितळांमध्ये कोरोनाबाधित मुलांवर उपचार करण्यासाठी स्वतंत्र वॉर्ड, आयसीयु कक्ष राखून ठेवण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे. त्याचप्रमाणे मुलांच्या उपचारासाठी आवश्यक असणाऱया औषधांचा पुरेसा साठा ठेवण्याची सूचना जिल्हाधिकाऱयांना दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे शिक्षण आणि आरोग्य खात्यामार्फत सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांची 15 दिवसांतून एकदा सामान्य आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.