आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांची पत्रकार परिषदेत टीका
प्रतिनिधी / बेळगाव
केंद्र व राज्यातील डबल इंजिन सरकार कोरोना समस्या हाताळण्यात व पॅकेज जाहीर करण्यात पूर्णतः अपयशी ठरले आहे, अशी टीका आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केली. पत्रकार परिषदेत बोलताना त्या म्हणाल्या, आत्मनिर्भरचा डांगोरा पिटणारे आता त्याविषयी बोलत नाहीत. गंगा स्वच्छ करण्याऐवजी ती मैली होत चालली आहे. कोठे आहे सरकार? असा प्रश्न त्यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातला हजार कोटीचे पॅकेज दिले. पण कर्नाटकाला काहीच दिले नाही. खेडय़ात घरोघरी कोरोना पसरला आहे. हॉस्पिटलमध्ये मृत्यू पावणाऱयांची संख्या अधिक आहे. सरकार मात्र सत्य दडवून कमी आकडेवारी दाखवत आहे. संख्या लपवून सरकार काय साधणार आहे? असा प्रश्न त्यांनी केला.
आर्थिक मदत न करता लॉकडाऊन केल्यास लोक काय करतील, असा प्रश्न करून केवळ डोळे न पुसता ग्राम पंचायतीतर्फे त्वरित आर्थिक मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली.
घरोघरी लसीकरण करून नागरिकांचे जीव वाचवा
लसीकरणाचा अहवाल जिल्हाधिकाऱयांना विचारला. परंतु तोही अद्याप मिळाला नाही. लसीकरणातही पक्षपात होत आहे. ऑनलाईन नोंदणी करा, असे सांगत आहेत. पण ग्रामीण भागातील महिला किंवा निरक्षर नागरिक ही नोंदणी कशी करतील, याचा विचार केला नाही. त्याऐवजी घरोघरी जाऊन लसीकरण करून नागरिकांचे जीव वाचवावेत, अशी अपेक्षाही त्यांनी केली.
लवकरच खरीप हंगामाला सुरुवात होत आहे. त्याबद्दल कृषी अधिकाऱयांकडे माहिती मागवली आहे. परंतु त्यांनी ही बाब गांभीर्याने घेतली नाही, अशी टीकाही त्यांनी केली.