पुणे महानगरपालिका व रा. स्व. संघ जनकल्याण समितेतर्फे आयोजित कोरोना मास स्क्रीनिंगचा अनुभव खूप छान होता. मला सगळे फार आवडले. मला परत असे काम करायला आवडेल वगैरे असे मी काहीच म्हणणार नाही कारण हे संकट लवकर संपू देत आणि आपले सगळय़ांचे नेहमीचे आयुष्य सुरू होऊ दे अशीच प्रार्थना आहे. पण तरीसुद्धा काही गोष्टी मनात आल्या म्हणून लिहावेसे वाटले.
‘कठीण समय येता संघ कामास येतो’ ह्या ओळी ऐकल्या होत्या. पण या कोरोनाच्या संकटकाळी वस्ती सर्वेक्षणाच्या कार्यात सहभागी होता आले आणि या गोष्टींचा प्रत्यय आला. ज्या दिवशी संघाच्या पुणे महानगर प्रचारकांचा फोन आला होता त्या दिवशी या योजनेतील एवढय़ा मोठय़ा गोष्टी ज्या सहजपणे त्यांनी सांगितल्या त्यावरून सर्व टीमने केलेल्या होमवर्कची जाणीव झाली. हे एरवीसारखे सरळ प्रकरण नाही आणि आतापर्यंत कधी अशी पूर्वदक्षता घेऊन काम करण्याची वेळ पण आलेली नव्हती. त्यामुळे हे अत्यंत वेगळे आव्हान कसे पेलणार वगैरे गोष्टींबाबत मनात विचार येत होते.
काम करायची तर खूप इच्छा होती. पण घरच्यांची परवानगी मिळाली तरच जा असे माझ्या सरांनी सांगितले. पण परवानगी काही मिळाली नव्हती. शेवटी एका दिवसाची का होईना परवानगी मिळाली. मग ती दोन दिवस वाढली. थोडी भीती होती मनात की आपण इच्छेविरुद्ध तर करत नाही ना घरच्यांच्या. पण काम करायची इच्छा तर खूप होती. यापूर्वी अनेक वेळा हट्ट करून वेगवेगळय़ा कार्यक्रमांना, अधिवेशन वगैरेला गेले होते अ.भा.वि.प.च्या. पण यावेळी विषय वेगळा होता सगळा, पण आमचे सर म्हणाले तसे जेवढे काम तुमच्या हातून होणार असते तेवढे देव आपोआप करून घेतो. आणि मग 1 चे 3 दिवस झाले.
रा. स्व. संघाच्या थेट योजनेतल्या एखाद्या कामात मी पहिल्यांदाच सहभागी होत होते. अ.भा.वि.प. त नाही म्हटले तरी थोडे हलकेफुलके वातावरण असते. इकडे एकदम खाकी शिस्त वगैरे. पण ती गरजेचीच होती. त्या मानाने खूप मोकळे वातावरण जाणवले मला. सर्वजण एकमेकांना करत असलेली मदत. तिथली व्यवस्था. म्हणजे एवढय़ा कठीण परिस्थितीतसुद्धा एवढी व्यवस्थित व्यवस्था. काम करताना एक धाकधूक होती की सगळे नीट झाले पाहिजे, आपल्याकडून काही राहता कामा नये. कोणी पेशंट सुटून जायला नको वगैरे. पण सगळय़ांच्या मदतीने ते नीट पार पडले. आणि सगळय़ात कोणती गोष्ट आवडली तर सहजता. खूपच प्रभावी. कदाचित आलेल्या परिस्थितीमुळे असेल किंवा कशामुळे पण सगळे एकमेकांना सहज मदत करत होते. कारण मला काम करताना असे विशेष टेन्शन आले नाही. जेव्हा नातेवाईक, परिषदेचे कार्यकर्ते, मित्रमंडळी यांचे फोन यायला लागले तेव्हा जाणीव झाली सगळय़ाची. टेन्शनविरहित काम सहजपणामुळे शक्मय झाले. गरवारे हॉस्टेलला जिथे आमची राहण्याची सोय केली होती तिथे अगदी छोटय़ा छोटय़ा गोष्टींची काळजी घेतली गेली होती. ठिकठिकाणी सॅनिटायझर, आम्हाला कामावर जाताना च्यवनप्राश, रात्री आयुर्वेदिक औषधी काढा, रोगप्रतिबंधक औषधे, सोशल डिस्टन्सिंगबाबतही सतत काळजी घेतली जात होती. वस्तीमध्ये गेल्यावर सगळे पीपीइ किट सांभाळत काम करणे कठीण होते. वरून सूर्यबाप्पाची कृपा! आणि आमची आणि त्यांची वेळ सारखीच त्यामुळे घामाघूम आणि तहान लागलेली. पण अशा परिस्थितीत सुद्धा कसे काम करायचे हे शिकायला मिळाले. घरोघरी गेल्यावर लोकांना बाहेर बोलावून त्यांचे तापमान पाहणे, इतर लक्षण पाहणे आणि नोंद करून घेणे हे काम. 4 जणांचा समूह. एकमेकात सहयोग असणे आवश्यक. हे सगळे सांभाळत लोकांकडून खरी माहिती गोळा करणे, त्यांना औषधे देणे व मास्क वाटणे ही सर्व कामे करायची होती. एकेका घरात 15 पेक्षासुद्धा जास्त माणसे राहत होती.
आमची टीम भवानी पेठेत ज्या एका घरात गेली होती तिथे तर बाहेर कट्टय़ावर बसलेले काका घरात किती लोक राहतात असे म्हटल्यावर म्हणाले ‘आम्ही दोघंच’ पण खोदून खोदून विचारल्यावर तिथून 15 माणसे बाहेर आली स्क्रीनिंगसाठी.
पहिल्यांदा माहिती लपविणाऱया माणसांना जेव्हा हे कळले की हे काम त्यांच्यासाठीच आहे तेव्हा मात्र अगदी आम्हाला बोलवून बोलवून सर्व कुटुंबीयांची त्यांनी तपासणी करून घेतली. त्या विश्वासामुळे आमचे काम काही ठिकाणी सोपे झाले. पण काही अपवाद सोडता लोक स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घेताना दिसले. स्वच्छतेच्या बाबतीत असेल किंवा लॉकडाऊन पाळण्याच्या बाबतीत. त्यांच्या परीने त्यांनी व्यवस्थित राहण्याचा प्रयत्न केलेला दिसून आला. पण या निमित्ताने आपली शहर रचना, लोकसंख्या, आरोग्य सेवा, शिक्षण आणि सामाजिक परिस्थिती यासाठी सर्वांनी पुढे येऊन राजकारण बाजूला ठेवून काम करण्याची गरज तीव्रतेने जाणवली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की ‘अत्यंत कमी संसाधने असूनसुद्धा भारत या संकटाचा प्रतिकार करत आहे.’ ही गोष्ट सद्यस्थितीत अभिमानास्पद आहे. पण कायमसाठी भूषणावह नाही. हे संकट संपल्यानंतर सुद्धा सर्वांनी एकत्र येऊन या सगळय़ा समस्यांवर प्रश्न उपस्थित न करता यावर तोडगा शोधण्यासाठी एकत्र आले पाहिजे असे वाटले. देशभर कोरोना विरुद्ध लढणाऱया सगळय़ा लोकांच्या कामाचा चांगला उपयोग होईल आणि हे सगळे लवकर संपेल हीच प्रार्थना.
मला लहानपणापासून मनोमन असे वाटायचे की आमच्या पिढीमध्ये कोण असे रा. स्व. संघाचे काम करेल वगैरे. अर्धी चड्डी, ती काळी टोपी, दंड वगैरे सगळे. असा प्रश्न जेव्हा मी बाबांना विचारला की कोण करेल हे संघाचे काम या मॉडर्न जगात, जिथे प्रत्येकाला पैसा कमवायचा आहे, प्रत्येकाला परदेशात जायचे आहे, तेव्हा बाबा म्हणाले होते की ‘वाढतच जाणार काम संघाचं’. मला कधी त्यावर विश्वास बसला नाही.. पण मी अ.भा.वि.प. चे काम करताना बघितलेली किंवा अनेक उदाहरणे डोळय़ाने बघितल्यावर मात्र या सगळय़ावर विश्वास बसायला लागला आणि या गोष्टीचा प्रत्यय क्षणोक्षणी आला. काळ बदलला, स्वरूप बदलले, आव्हाने बदलली, पण काम तसेच आहे. नवनवीन पैलूंनी अगदी देशात नाही तर परदेशातसुद्धा वाढत आहे. आणि सारे जग या समस्येशी झुंजत असताना ‘ले चलें हम राष्ट्र नौका को भवर से पार कर ।’ असे म्हणत सामान्य असणारे पण असामान्य ठरलेले अनेक संस्था, संघटनांचे असंख्य हात या युद्धात उतरले आहेत. त्या सर्व वीरांना प्रणाम.
– वैद्य देवश्री खरे
टिळक आयुर्वेद महाविद्यालय, पुणे