प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यात लॉकडाऊन जारी असल्याने मृत्यू झालेल्यांच्या अस्थी नदी पात्रात विसर्जन करणेही कठीण झाले आहे. दरम्यान कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचे नातेवाईक अस्थी घेऊन जाण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या 1 हजार जणांच्या अस्थी बुधवारी राज्य सरकारकडूनच कावेरी नदीत विसर्जित करण्यात आल्या. महसूलमंत्री आर. अशोक यांनी स्वतः बुधवारी मृतांच्या अस्थी नदीपात्रात विसर्जित केल्या.
बुधवारी दुपारी 12 वाजता मंडय़ा जिल्हय़ातील मळवळ्ळी तालुक्यातील बेळवाडी येथील अन्नपुर्णेश्वरी आणि काशी विश्वनाथ मंदिराजवळ कावेरी नदीमध्ये अस्थी विसर्जित केल्या.
कोरोना विषाणूमुळे मृत्यू झालेल्यांची अस्थी घेऊन जाण्यासाठी नातेवाईकांना 15 दिवसांची मुदत देण्यात आली होती. मात्र अनेकांनी अस्थी घेऊन जाण्यास नकार दिला. त्यामुळे सरकारने 1 हजार मृतांच्या अस्थी जमा केल्या होत्या. बुधवारी त्या सरकारकडूनच नदीपात्रात विसर्जित करण्यात आल्या.