- राज्यातील जनतेला मुख्यमंत्र्यांकडून दसऱ्याच्या पूर्वसंध्येला शुभेच्छा!
ऑनलाईन टीम / मुंबई :
कोरोना संकटावर मात करून महाराष्ट्र नव्या जोमाने भरभराट आणि समृद्धीकडे वाटचाल करेल, असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी राज्यातील जनतेला दसऱ्याच्या पूर्वसंध्येला शुभेच्छा दिल्या आहेत.
विजयादशमी म्हणजे संकटावर, वाईट प्रवृत्तीवर विजय मिळविण्याची प्रेरणा. यंदाच्या या विजयादशमी म्हणजेच दसऱ्याच्या उत्सवातून सीमोल्लंघन करून विजय खेचून आणण्याची प्रेरणा घेत आपण एकजुटीने कोरोना विषाणूरूपी रावणाचा नाश करूया! असे आवाहन यावेळी जनतेला केले.
पुढे ते म्हणाले, लढवय्या महाराष्ट्र, अशी आपली ओळख आहे. आपण अनेकदा संकटांचा यशस्वी मुकाबला केला आहे. त्यामुळे कोरोना विषाणूच्या विरोधातील लढ्यातही आपण सर्व भेद बाजुला ठेवून एकवटले आहोत.
यावर्षी आपल्याला दसरा उत्साहात साजरा करतानाच विषाणूच्या समूळ उच्चाटनासाठी आरोग्य दक्षतेचे, गर्दी न करण्याचे, शारिरीक अंतर राखण्याचे, मास्क वापरण्याचे, वारंवार हात धुण्याच्या सूचनेचे पालन करावे लागेल. अशा प्रयत्नातूनच आपण कोरोनारुपी रावणाचा नाश करु आणि नव्या जोमाने भरभराटीकडे आणि समृद्धीकडे वाटचाल करु, असेही त्यांनी यावेळी सांगितले.