जिल्ह्यात २५ हजार पासपोर्टचे काम ठप्प, सहा महिन्यांपासून पासपोर्ट कार्यालय बंद,
पर्यटक, एजन्सींकडून कार्यालयाची मागणी
विद्याधर पिंपळे / कोल्हापूर
‘दुनिया की सैर’ची इच्छा असलेले कोल्हापूरकर लॉकडाऊन झाले. विविध कारणामुळे परदेशी जाणाऱया स्थानिकांना थांबावे लागले आहे. लॉकडाऊनच्या ६ महिन्यांत कोल्हापुरातील पासपोर्ट कार्यालयात सुमारे २५ हजार नवीन पासपोर्ट काढणाऱ्यांना `ब्रेक’ लागला आहे. पासपोर्टद्वारे मिळणाऱ्या सुमारे ४ कोटींचा महसूल थांबला आहे. त्यामुळे पासपोर्ट कार्यालय लवकर सुरू करावे, अशी मागणी पर्यटक व ट्रव्हल्स एजन्सीकडून होत आहे.
शिक्षण, नोकरी, उपचार, सहल, नातेवाईकांची भेट, कॉर्पोरेट कंपन्यांना भेट आदी कारणांनी कोल्हापुरातील अनेक जण परदेशात जात आहेत. त्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पासपोर्ट काढणार्यांची संख्या वाढली आहे. यापुर्वी पासपोर्टसाठी कोल्हापुरातील लोकांना पुण्याला जावे लागत होते. त्यामुळे पैसा, वेळेचा अपव्यय होत होता. त्यामुढे कोल्हापुरात पासपोर्ट कार्यालय सुरू करावे, अशी मागणी वाढत होती. माजी खासदार धनंजय महाडिक त्यांच्या प्रयत्नामुळे २५ मार्च २०१४ ला रमणमळा येथील मुख्य पोस्ट कार्यालय येथे पारपत्र सेवा केंद्राचा प्रारंभ झाला. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव ज्ञानेश्वर मुळे यांच्या उपस्थितीत या कार्यालयाचे उद्घाटन झाले. त्यामुळे कोल्हापुरातील परदेशी जाणाऱ्यांच्या संख्येबरोबर पासपोर्ट काढणाऱ्यांच्या संख्येत वाढ होऊ लागली. पहिल्या वर्षी १६ हजार ७६१ जणांनी पासपोर्ट काढला. २०१७ मध्ये पासपोर्टधारकांची संख्या २७ हजार ५०० इतकी वाढली. २०१९ मध्ये ५० हजार जणांनी पासपोर्ट काढल्याचे सांगण्यात आले.
राज्यात पहिल्या टप्प्यात ५९ पासपोर्ट सेवा केंद्र सुरू केले. राज्यातील तीन शहरांमधील पासपोर्ट कार्यालयापैकी कोल्हापूर प्रथम क्रमांकाचे कार्यालय ठरले आहे. कोरोनामुळे सहा महिन्यांपासून पासपोर्ट कार्यालय बंद आहे. त्यामुळे पासपोर्टसाठी इच्छुकांना प्रतीक्षा करावी लागत आहे. लवकरात लवकर कोल्हापूरचे पासपोर्ट कार्यालय पुन्हा सुरू करावे, अशी मागणी होत आहे.
कोल्हापूरचे पासपोर्ट कार्यालय लवकर सुरु करा –बी. व्ही. वराडे, उपाध्यक्ष, कोल्हापूर ट्रव्हल्स एजंट असोसिएशन
कोल्हापुरात पासपोर्ट कार्यालय सुरू झाल्याने येथील लोकांची चांगली सोय झाली आहे. वेळेचा अपव्यय व खर्च कमी झाल्याने पासपोर्ट इच्छुकांची संख्या वाढत आहे. गतवर्षी सुमारे ५० हजार जणांनी पासपोर्ट काढला आहे. सहा महिन्यापासून कार्यालय बंद आहे. ते लवकर सुरू करावे, अशी मागणी आहे.
कोल्हापूर पासपोर्ट कार्यालय
परराष्ट्र व्यवहार मंत्रालय व टपाल विभाग यांच्यावतीने रमणमळा येथे कोल्हापूर मुख्य टपाल कार्यालय येथे पासपोर्ट सेवा केंद्र सुरू केले आहे. प्रत्येक दिवशी २०० इच्छुकांना टोकन दिले जाते. प्रत्येकी एकावेळी २५ लोकांच्या कागदपत्रांची छाननी केली जाते. चार टेबलवर कागदपत्रांची छाननी केल्याने, इच्छुकांना २१ दिवसांत नवीन पासपोर्ट मिळत आहे. त्यासाठी पंधराशे रुपये असून हा पासपोर्ट दहा हा पासपोर्ट दहा वर्षासाठी आहे. तसेच नूतनीकरणासाठी पंधराशे रुपये मोजावे लागत आहेत.