प्रतिनिधी/ गगनबावडा
एकवीस वर्षे शासनदरबारी कैफियत मांडूनही शासनाने नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात टाळाटाळ केली आहे.२० डिसेंबर अखेर प्रशासनाने याबाबत पाठपुरावा केला नाही तर सोमवार दि. २१ डिसेंबर रोजी राई येथील धामणी मध्यम प्रकल्प ते थेट कोल्हापूर जिल्हा अधिकारी कार्यालय पर्यंत धामणी धरणग्रस्त पायी प्रवासाचे वेगळे आंदोलन करत शासनाला जाग आणणार असल्याचा इशारा राई येथील श्रमिक मुक्ती दल धामणी धरणग्रस्त संघटनेच्या वतीने दिला आहे.
गगनबावडा,पन्हाळा व राधानगरी या तीन तालुक्यातील ४० गावांचा समावेश असलेल्या धुंदवडे व धामणी खोरीत हरितक्रांती घडविणाऱ्या राई येथील धामणी मध्यम प्रकल्पाच्या कामास १६ नोव्हेंबर २००० रोजी सुरुवात केली.निधीअभावी प्रकल्प अर्ध्यावरच रखडला आहे.या, ना, त्या कारणाने धरणग्रस्तांनाही वाटाण्याच्या अक्षता दिल्या आहेत.२१ वर्षे मागे पडली तरी येथे कोणत्याही प्रकारच्या नागरी सुविधा दिलेल्या नाहीत.दोन वर्षांपासून गट नं.९९ मध्ये वसाहत क्र.१ तसेच गट नं.८३ मध्ये वसाहत क्र.२ मध्ये नवीन वसाहती विस्थापनाचे काम युध्द पातळीवर सुरु आहे.मात्र येथे रस्ते, वीज,पाणी,शिक्षण या पायाभूत सुविधांची वानवा आहे.याबाबत प्रशासनास वारंवार लेखी,तोंडी निवेदन दिले आहे.जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी,आमदार व अन्य लोकप्रतिनिधी यांना साकडे घातले पण आजअखेर आश्वासनापलिकडे काहीही पदरात पडले नाही. २१ वर्षांपासून येथील जनतेला रानटी जिवन जगावे लागते.आमच्या प्रलंबित मागण्या मान्य कराव्यात,आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे अन्यथ: २१ डिसेंबर रोजी आमच्या राई गावापासून थेट जिल्हा अधिकारी कार्यालयापर्यंत आम्ही धरणग्रस्त पायी चालण्याचा आंदोलनाचा वेगळा मार्ग अवलंबणार आहे.श्रमिक मुक्तीदलाने दिलेल्या निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष गुंडोपंत जिनगरे, उपाध्यक्ष देऊ पाटील, क्रुष्णा जिनगरे,संजय शिंदे,धोंडीबा गुरव, युवराज गुरव अशा दहा पदाधिकारी धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.हे निवेदन उपविभागीय अधिकारी राधानगरी,कार्यकारी अभियंता कोल्हापूर,आमदार प्रकाश आबिटकर,तहसिलदार राधानगरी, पोलिस निरीक्षक राधानगरी यांना यासंबंधीचे निवेदन दिले आहे.
प्रकल्प स्वप्न की दिवास्वप्न ठरणार?
रखडलेल्या धामणी मध्यम प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी गतवर्षी ७७२ कोटी निधीची तरतूद केली होती.कामाचे टेंडरही निघाले पण कोरोणा काळातील संचारबंदीचा फटका बसला.हजारो शेतकऱ्यांना जिवनदाई ठरलेल्या प्रकल्पाचे सद्याचे अर्धवट काम केव्हा पूर्ण होणार? तीन तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांचे स्वप्न पूर्ण होणार की दिवास्वप्न ठरणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.स्थानिक लोकप्रतिनिधीं याबाबत पून्हा आवाज उठविण्याची मागणी येथील जनतेतून होत आहे.