नववी, अकरावीची पुर्नपरीक्षा रद्दचा शासनाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
तोंडी परीक्षेत उत्तीर्ण झाल्यास थेट दहावी आणि बारावीच्या वर्गात प्रवेशाच्या परिपत्रकावर उलट-सुलट चर्चा
अहिल्या परकाळे / कोल्हापूर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पहिली ते नववी आणि अकरावीची परीक्षा रद्द करून, सरासरी गुणावर सर्वच विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केले आहे. पुस्तक वितरणवेळी निकालपत्रकाचे वाटपही झाले आहे. तरीही शासनाने नववी व अकरावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची पुर्नपरीक्षा रद्द करून तोंडी परीक्षा घेणार असल्याचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. सर्वच विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केले असताना शासन कोणाची तोंडी परीक्षा घेणार यावर शिक्षण क्षेत्रात उलट-सुलट चर्चा सुरू आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन आदेशानुसार पहिली ते नववी, अकरावी एवढेच नव्हे तर पदवी व पदव्युत्तरच्या परीक्षा रद्द करून सरासरी गुणांवर सर्वच विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केले आहे. त्यामुळे लेखी किंवा तोंडी परीक्षा घेण्यावर शिक्षण संस्था, शाळांनी फुलस्टॉप दिला आहे. तरीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांची पुर्नपरीक्षा रद्द करून तोंडी परीक्षा प्रत्यक्ष वर्गात किंवा व्हिडीओ कॉन्फसिगव्दारे घेण्यात येणार आहे. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या नववीच्या विद्यार्थ्यांना दहावीत आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना बारावीत प्रवेश देण्यात येणार आहे, असे परिपत्रक प्रसिध्द करून शासनाने शिक्षण क्षेत्रात गोंधळ निर्माण केला आहे. शाळा सुरू करण्याचा निर्णय जिल्हय़ावर न सोपवता शासनानेच परिपत्रक काढून नवीन शैक्षणिक वर्ष जाहीर करावे, अशी शिक्षकांची मागणी असताना शासन वारंवार चुकीची परिपत्रक काढून शिक्षण क्षेत्रात संभ्रामवस्था निर्माण करीत असल्याचा आरोप शिक्षक संघटना करत आहेत.
नववी व अकरावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून जून-जुलैमध्ये पुर्नपरीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केले जायचे. हा निर्णय स्वागतार्ह असला तरी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर याचा परिणाम होताना दिसतो. प्रत्येक शाळा आपली गुणवत्ता टिकवण्याचा नेहमीच प्रयत्न करीत असते. कारण दहावी, बारावीच्या निकालावर संबंधित शाळेचा गुणात्मक दर्जा ठरवला जातो. त्यामुळे अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची पुर्नपरीक्षा घेऊन त्यांना महिनाभरात उत्तीर्ण करणे चुकीचे असल्याचे बोलले जात आहे. यंदा तर सर्वच परीक्षा रद्द केल्याने विद्यार्थ्यांची गुणवत्ता सरासरीनुसार ठरवली गेली आहे. त्यामुळे लेखी आणि तोंडी परीक्षेचा प्रश्नच उद्भवत नाही, असा सवाल शिक्षण क्षेत्रातून केला जात आहे.
परीक्षा घेणार कोणाची
शासन निर्णयाप्रमाणे सर्वच विद्यार्थी सरासरी गुणानुसार पुढच्या वर्गात घातले आहेत. तर शासन कोणत्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची परीक्षा घेणार आहे. एखादे परिपत्रक काढताना विचारपूर्वक काढून शिक्षण क्षेत्राला योग्य मार्गदर्शन करावे. चुकीचे परिपत्रक काढून शिक्षक क्षेत्रात गोंधळ निर्माण करू नये. – खंडेराव जगदाळे (राज्यउपाध्यक्ष, राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समिती)