पद्मश्री डॉ. करनाम मल्लेश्वरी यांचे आवाहन, डी. डी. कोसंबी व्याख्यानमाला
प्रतिनिधी/ पणजी
क्रीडा क्षेत्रात राष्ट्रीय पातळीपर्यंत मजल मारणाऱयांना सरकारी नोकरी मिळते. आंतरराष्ट्रीय पातळी गाठणाऱयांवर करोडो रुपयांची बरसात होते. क्रीडा क्षेत्रात करीअर करण्यावर प्रत्येक विद्यार्थ्याने विचार करावा, शैक्षणिक पदवी कधीही घेता येते, असे आवाहन करताना गोवा सरकारने क्रीडा अकादमी स्थापन करून संपूर्ण शिक्षण या विषयात घेण्याची सोय करावी, आपण सदैव मदत करायला तयार आहे, असे प्रतिपादन भारताची पहिली ऑलंपिक महिला सुवर्ण पदक विजेती पद्मश्री डॉ. करनाम मल्लेश्वरी यांनी केले.
तेराव्या डी. डी. कोसंबी विचार महोत्सवाच्या सांखळी पहिले पुष्प वाहताना त्यांनी आपली सडेतोड मते मांडली आणि विद्यमान शिक्षण पद्धती आणि पालकांच्या मानसिकतेवर जोरदार प्रहार केला.
दिल्ली आणि इतर राज्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम आणि क्रीडा संकुले आहेत. पण ती मुलांना वापरायला दिली जात नाहीत. वापराविना बंद ठेवली जातात. ऑलंपिक मध्ये सुवर्णपदक प्राप्तीची अपेक्षा ठेवतात असे, त्या म्हणाल्या.
ऑलंपिकमध्ये भारत वेटलिफ्टिंग क्रीडा प्रकाराचे भवितव्य या विषयावर मेजर आश्विन पोगला यांनी त्यांची मुलाखत घेतली. प्रत्येक शाळेत जीमची व्यवस्था झाली पाहिजे. गावागावात व्यायाम शाळा तयार झाल्या पाहिजेत, असे सांगताना शहर किंवा गावापासून 15 ते 20 कि. मी. अंतरावर सरकारने क्रीडा संकूल बांधले आहेत. तेथे जाण्याची वाहतूक व्यवस्था नाही. मुलांना सोडण्यास पालकांकडे वेळ नाही. अभ्यास गृहपाठ, मोबाईल गेम्स याच्या नादात मुलांनी क्रीडा क्षेत्राकडे पाठ फिरवल्याचे त्यांनी सांगितले.
12 वर्षाची असताना त्यांनी एकदा वजन उचलण्याच्या त्या उपकरणाला हात लावला तेव्हा तेथील प्रशिक्षक तिच्यावर ओरडले. तुझ्याने हे जन्मात शक्य होणार नाही, असे सांगून सर्वांच्या समोर त्यांना अपमानीत केले. सतत दोन तीन दिवस मानसिक दडपणाखाली असल्याने तिच्या आईने सखोल चौकशी केली. झाला प्रकार समजला तेव्हा त्या प्रशिक्षकाला तुझी जिद्द दाखवून वजन उचलण्यात नाव कमव असा सल्ला आईने दिला व वेळोवेळी सहकार्य केले.
जीवनात अपयश आलेच पाहिजे, असे सांगताना अपयशानंतच डोळे उघडतात व या अपयशानंतरच माणूस शिकतो, असे त्या म्हणाल्या. क्रीडा क्षेत्रात नव्हे तर प्रत्येक क्षेत्रात शिस्त ही असायलाच ही असे त्या म्हणाल्या. आपल्या उभ्या आयुष्यात आपण सिनेमा थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहिला नाही. पिझ्झा, बर्गर किंवा फास्ट फूड खाल्ले नाही. दिवसातून 12 तास व्यायाम व मेहनत घेतली तेव्हा कुठे नाव कमवले. अशी मेहनत घेण्याची प्रत्येकाने तयारी ठेवावी, असे त्या म्हणाल्या.
त्यांचे पती राजेश त्यागी यांच्या साहाय्याने त्यांनी वेट लिफ्टींग अकादमी स्थापन केली आहे. सुमारे 250 विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याची सोय आहे. ज्यांना या क्षेत्रात भवितव्य घडवायचे आहे त्यांनी सरळ या अकादमीत यावे, असे आवाहन त्यांनी केले व 2028 मध्ये सदर अकादमी भारताला ऑलंपिक मेडल मिळवून देणार अशी घोषणा केली.
गोवा सरकारनेही अकादमी स्थापन करावी, आणि प्रत्येक मुलाचे क्रीडा कौशल्य जाणून त्यांना प्रशिक्षित करावे. वेटलिफ्टिंग मध्ये आपण सहाय्य करायला तयार असल्याचे त्या म्हणाल्या.
शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात मुलींचेच वर्चस्व आहे, असे सांगताना शहरातून नव्हे तर यापुढे ग्रामीण भागातून क्रीडापटू तयार होतील. आपण 30 वर्षापूर्वी स्थापलेले नॅशनल रिकॉर्ड अजून अबाधित आहे. असे सांगताना त्यांनी दु:ख व्यक्त केले आणि यापुढे नवी पिढी तयार करण्यावर आपण वाहून घेतल्याचे त्यांनी सांगितले.
आपला 18 वर्षाचा मुलगा शुटींगमध्ये तर 14 वर्षाचा मुलगा टेनीसमध्ये आहे. त्यांनी वेटलिफ्टिंग मध्ये येण्याची त्यांच्यावर जबरदस्ती नाही. ज्यांना ज्या क्षेत्रात करीअर करायचे आहे त्यांना करू द्या. ज्या मुलांना शिक्षणात रस नाही पण त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात मग ती कला असो, नाटक किंवा क्रीडा त्यांना त्यांचे क्षेत्र निवडू द्या. एकदा ध्येय समोर ठेवले की त्याला 100 टक्के बहाल करा. फक्त मेहनत आणि मेहनत करा यश आपोआप मागे येईल, असे त्या म्हणाल्या.
सरकारी नोकरी मिळाविण्यासाठी शिक्षण घेणारे पाहिलेत, राष्ट्रीय पातळीवर खेळणाऱयालाही आता सरकारी नोकरी मिळते. सिद्धू सारखी आय. ए. एस. परीक्षा न देता आय. ए. एस. अधिकारी बनते. मल्लेश्वरी सारखीला पीएचडी डॉक्टरेट दिली जाते. आपण दहावी पर्यंतचे शिक्षण घेतले होते. ऑलंपिक मेडल घेतल्यानंतर एम. बी. ए. चे शिक्षण घेतले. वयाच्या 30 वषापर्यंत क्रीडा क्षेत्र आहे. शिक्षण पूर्ण करायचे आहे तर संपूर्ण आयुष्य आहे असे त्या म्हणाल्या.