खानापूर : राजा शिवछत्रपती चौक ते रेल्वेस्टेशन हा रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे. हा रस्ता दुरुस्त करण्याची वारंवार मागणी करूनदेखील सार्वजनिक बांधकाम खात्याने त्याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. याबद्दल नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. राजा शिवछत्रपती चौक ते रेल्वेस्टेशन हा चारशे मीटर लांबीचा रस्ता आहे. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत येतो. या रस्त्यावर तहसीलदार, नगरपंचायत, पोस्ट ऑफीस, रेल्वेस्टेशन, सर्वोदय विद्यालय, सार्वजनिक बांधकाम खाते, जिल्हा पंचायत आदी कार्यालये आहेत. यासह असोगा, मन्सापूर व भोसगाळी या गावांना जाणारा हा रस्ता आहे. गेल्या दहा वर्षांपूर्वी आमदार प्रल्हाद रेमाणी यांनी हा रस्ता आपल्या निधीतून रुंद करून डांबरीकरण केले होते. त्यानंतर या रस्त्याची साधी देखभालही केली गेली नाही. सध्या हा रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे. त्यामुळे तो वाहतुकीस त्रासदायक बनला आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने सदर रस्ता तातडीने करावा, अशी मागणी शहरातील नागरिकांतून करण्यात येत आहे.
चारशे मीटर रस्त्यासाठी 30 लाख खर्च अपेक्षित
याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता हलगी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी चारशे मीटर रस्त्यासाठी अंदाजे 30 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. या रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्याचबरोबर तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम खात्याकडे असलेला 40 कि. मी. रस्त्याच्या दुरुस्तीसाठीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. प्रस्ताव मंजूर होऊन निधी आल्यास आपण ते काम तातडीने पूर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.