उचगाव / वार्ताहर
दुग्ध व्यवसाय करून केवळ नफा मिळविण्याचा उद्देश न ठेवता सामाजिक उपक्रम राबवून अल्पावधीतच बेळगाव जिह्यात गणेश दूध संकलन केंद्राने नावलौकिक मिळविला. या केंद्राचा इतरांनी आदर्श घ्यावा, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनूर यांनी केले.
येथील नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाऊंडेशन आणि हेल्थ अँड नेचर डेव्हलपमेंट सोसायटी यांच्यावतीने रविवार दि. 5 रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींना चिकोडी येथील घट्टी सभागृहात पुरस्कार प्रदान कार्यक्रमावेळी त्या बोलत होत्या. सावनूर यांच्या हस्ते उचगाव, तालुका बेळगाव येथील गणेश दूध संकलन केंद्राचे चेअरमन उमेश देसाई यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
व्यासपीठावर कोल्हापूर येथील उद्योजक व महाराष्ट्र राज्य क्रांती सेनेचे अध्यक्ष सुरेशदादा पाटील, गुलबर्गा येथील जिल्हा पोलीसप्रमुख महेश मेघण्णावर, जिल्हा कमांडंट अरविंद घट्टी, माजी खासदार अमरसिंह पाटील यांची उपस्थिती होती. यावेळी उमेश देसाई म्हणाले, मोफत मार्गदर्शन शिबिरे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, दूध वाटप, खानापूर व चंदगड तालुक्मयातील पूरग्रस्त भागात मदत दिली आहे. दुग्ध व्यवसायात मोठय़ा संधी असून उत्पादकांना अधिक दर देण्याबरोबरच तरुणांना रोजगारही मिळाला आहे. दुर्बल घटकांचा स्तर उंचावण्यासाठी दूध संघाने पुढे यावे.’ यावेळी गणेश दूध संकलन केंद्राचे संचालक किरण देसाई, व्यवस्थापक सुधाकर करटे, शिवाजी कोलते, सुशांत कुंडलकर आदी उपस्थित होते.