आमदार दीपक केसरकर यांची माहिती : कठीण प्रसंगात राजकारण नको!
वार्ताहर / सावंतवाडी
सिंधुदुर्ग लवकरच ग्रीन झोनमध्ये येणार आहे. त्यामुळे जिल्हय़ाबाहेरून येणाऱऱयांनी थोडी कळ सोसावी. संयम पाळावा. जिल्हय़ात येण्याची घाई करू नये. हा जिल्हा आपल्या सर्वांचा आहे. त्यामुळे जिल्हा लवकरात लवकर कोरोनामुक्त कसा होईल, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. येत्या दोन दिवसात गोरगरीब सर्वसामान्य जनतेला अधिकाधिक मदतकार्य केले जाणार आहे. प्रत्येक नागरिकाला मास्क, सॅनिटायझर तसेच डॉक्टरना पीपीई किट्स उपलब्ध होतील. सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ले या तिन्ही मुख्य शहरात ते दिले जातील, अशी माहिती आमदार दीपक केसरकर यांनी दिली.
‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग हाच मुख्य पर्याय आहे. मी माझ्या मतदारसंघात आणि जिल्हय़ात राहणे मला आवडणार नाही का? मी मुंबईत रेड झोन असलेल्या भागात राहतो. मी सिंधुदुर्गात आलो असतो व राहिलो असतो तर ते योग्य झाले नसते. सरकारने जे नियम घालून दिले आहेत, ते मी पाळत आहे, असेही केसरकर म्हणाले.
अलिकडे माझा छोटासा अपघात झाला होता. त्यानंतर मी सावंतवाडीत माझ्या चालक व कर्मचाऱयांसह आलो होतो. अवघे बारा तास राहून मी पुन्हा तसाच मुंबईत परतलो. कारण त्यावेळी मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला होता. त्यामुळे माझ्यासोबत आलेल्या कर्मचारी व चालकांना सावंतवाडीत राहावे लागणार होते आणि ते नियमांच्या दृष्टीने उल्लंघन होते.
मी मुंबईत राहून गोव्यात अडकलेल्या अनेक तरुण-तरुणींना मदतीचा हात दिला आहे. तसेच मुंबई, पुणे व अन्य भागात त्यांनी माझ्याशी संपर्क साधला, त्या सर्वांना मदत केली आहे आणि करत आहे. जे लोक वाटेत अडकले आहेत, त्यांनाही मदतीचा हात देत आहे.
ग्रीन झोनसाठी प्रयत्न
काही मंडळी क्वारंटईनच्या त्यांच्या मुद्यावरून राजकारण करत आहेत, ते योग्य नाही. जिल्हय़ात आले तरी टीका करायची आणि जिल्हय़ाबाहेर आहे तरीही टीका करायची, हे योग्य नाही. मी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम व अन्य प्रमुख पदाधिकाऱयांशी सातत्याने संपर्कात आहे. हा जिल्हा लवकरात लवकर ग्रीन झोनमध्ये यावा, यासाठी आमचे सर्वांचे प्रयत्न आहेत.
आंबा मार्केटसाठी प्रयत्न
जिल्हय़ातील आंबा वाशी मार्केटमध्ये जावा, यासाठी मी प्रयत्न केले. तसेच खासदार विनायक राऊत यांनीही आंब्याला मार्केटसाठी प्रयत्न केले. माझ्या मतदारसंघात पालकमंत्री उदय सामंत येऊन गेले आहेत. मी माझ्या आमदार निधीतून ‘कोरोना’शी लढाईसाठी 50 लाख रुपये दिले आहेत. तसेच आता वैयक्तिक व मित्रमंडळींकडूनही मदत करणार आहे. माझ्या एका उद्योजक मित्रासोबत चर्चा होणार आहे. त्यांनी सकारात्मक भूमिका घेतली तर लवकरच मतदारसंघातील गोरगरीब लोकांना, रोजंदारी कामगारांना मोठी मदत दिली जाईल. तसेच उर्वरित जिल्हय़ातही मदत केली जाईल, असे केसरकर म्हणाले.
सावंतवाडी नगरपालिकेला 20 हजार मास्क आपण दिले आहे. तसेच जिल्हा नियोजनकडून 18 लाख रुपये दिले आहेत तसेच नाटय़गृह, पाणीपुरवठा यासाठीही निधी दिला आहे आणि यापुढेही देणार आहे. जे एकही रुपयाचा निधी आणू शकत नाहीत, ते गवगवा करत आहेत, अशी टीकाही केसरकर यांनी केली.