वृत्तसंस्था / नवी दिल्ली
15 जून 2020 रोजी मध्यरात्री लडाखमधील गलवान येथे भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये जोरदार संघर्ष होऊन भारताचे 20 सैनिक मारले गेल्याने निर्माण झालेला तणाव आजही सुरू आहे. मात्र हा संघर्ष चीननेच हेतूपुरस्सर घडविला होता, असा अहवाल अमेरिकेच्या आयोगाने तेथील कनिष्ठ लोकप्रतिनिधीगृहाला (काँगेस) सादर केल्याने चीनचे कारस्थान उघड झाले आहे.
‘अमेरिका-चीन आर्थिक आणि सामरिक आढावा आयोग’ असे या आयोगाचे नाव असून तो अमेरिकेच्या प्रशासनानेच स्थापन केला आहे. या आयोगाने गेले पाच महिने सविस्तर आणि सखोल अभ्यास करून चीनचे डावपेच उघड केले आहेत. चीन आक्रमक असल्याचे यातून पुन्हा सिद्ध झाले आहे.
उपग्रहीय छायाचित्रातून गलवान येथे चीनने या संघर्षाआधी मोठय़ा प्रमाणावर सैन्य आणल्याचे स्पष्ट होत आहे. चिनी सैनिकांची संख्या 1000 हून अधिक होती. याचाच अर्थ असा की चीनने संघर्षाची पूर्वतयारी केली होती. त्यामुळे भारतीय सेनेबरोबरची चकमक क्षणिक कारणांमुळे झाली हा चीनचा दावा खोटा असल्याचे स्पष्ट होते, असे अहवालात सांगण्यात आले आहे.
तैवानलाही धोका
चीनच्या आक्रमक विस्तारवादाचा धोका केवळ भारतालाच नव्हे तर तैवान या छोटय़ा देशालाही आहे. चीनने तैवान गिळंकृत करण्याची महत्त्वाकांक्षा जोपासली आहे. तसेच हाँगकाँगमधील लोकशाही संपविण्याचाही चीनचा डाव आहे. आफ्रिकेतही चीन पैशाच्या जोरावर हातपाय पसरत आहे. चीनच्या प्रत्येक हालचालीकडे सावधपणे पाहण्याची आवश्यकता आहे. या अहवालावर सभागृहात लवकरच चर्चा होण्याची शक्यता आहे.