प्रतिनिधी/ रत्नागिरी
अमावास्यामुळे श्रावण सुरु होण्यापूर्वी रत्नागिरीत रविवारी चिकन व मटणावर ताव मारण्यासाठी खवय्यांची गर्दी पहायला मिळाली. गटारी अमावास्येमुळे चिकन व मटनमार्केटमधले दरही कडाडलेले पहायला मिळाले. मटनाचा किलोचा दर 660 वर तर चिकनच्या दरातही 30 रुपये वाढ करण्यात आली होती.
चिकन व मटण खरेदी करण्यासाठी रत्नागिरीतल्या चिकन मार्केटमध्ये खवय्यांची अक्षरशः झुंबड उडालेली पहायला मिळाली. गटारी अमावास्येला गावठी कोंबडय़ाला विशेष मागणी असते. रत्नागिरीच्या बाजारात एक गावठी कोंबडा चक्क 1 हजार रुपयांनी विकला जातोय. श्रावण सुरु होण्यापूर्वी कोकणात शेतात राखणा देण्याची परंपरा आहे. या राखण्यासाठी गावठी कोंबडय़ाचा वापर करतात. त्यामुळे गावठी कोंबडा मिळत नाही, अशी रत्नागिरीच्या मार्केटमधली परिस्थिती पहायला मिळाली.
गावठी कोंबडय़ाची मागणी लक्षात घेत तब्बल 1 हजार रुपयांनी गावठी कोंबडा विकला जातोय. चिकनचे दरही 30 रुपयांनी वाढलेत. जीवंत कोंबडीचे किलोचे दर 150च्या पुढे गेलेत. दर वाढले असूनही श्रावण सुरु होण्यापूर्वी मांसाहारी खाण्याची हौस रविवारी अनेकांनी पूर्ण केली.