प्रधानमंत्री कार्यालयाने तुये येथील युवकाच्या तक्रारीची घेतली दखल
मोरजी/ प्रतिनिधी
जीवनदायिनी, पेडणे संस्थेचे खजिनदार तथा तूये पेडणे येथील नागरिक संजय राऊत यांच्या तक्रारीची पंतप्रधान कार्यालयाकडून दखल घेत राष्ट्रीय महामार्ग 66 वरील गिरी उड्डाण पुलाजवळील मेलेले धोकादायक अवस्थेतील ते माड हटवले. त्यामुळे संजय राऊत यांनी पंतप्रधान कार्यालयाचे आभार मानले. तसेच पंतप्रधान कार्यालयाचा गोव्याच्या मुख्यमंत्री कार्यालयाने आदर्श घ्यावा असे सांगितले आहे.
याबाबत तूये पेडणे येथील नागरिक तथा व्यवसायाने चार्टर अकौंटंट असलेल्या संजय राऊत यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, आपण कामानिमित्त म्हापसा – पणजी हमरस्त्यावरून प्रवास करतो त्यामुळे गिरी म्हापसा येथे एका उड्डाण पुलाजवळ धोकादायक अवस्थेतील सुकलेल्या माडांच्या बुंध्यावर माझे लक्ष गेले अगदी धोकादायक अवस्थेतील ते माड कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्मयता होती या मार्गावर प्रवास करणाऱया दुचाकी स्वारांसाठी हे माड म्हणजे मृत्यूचे सापळेच होते.
पावसाळय़ात वादळ वाऱयाचा संभाव्य धोका लक्षात घेवून आपण याविषयी 15 जून 2021 रोजी उत्तर गोवा जिल्हाधिकाऱयांना ईमेल पाठवून याकडे गांभीर्याने लक्ष घालण्याची विनंती केली. या रस्त्याच्या मधोमध असलेले धोकादायक अवस्थेतील 36 माड हटवण्याची मागणी केली. त्यांच्याकडून काहीही प्रतिसाद न मिळाल्याने आपण 19 जून रोजी याविषयी पुन्हा मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्या कार्यालयाला ईमेल पाठवून तातडीने दखल घेण्याची विनंती केली. त्याच वेळी राज्यपालांना सुद्धा या विषयी कळवले, मात्र कुणीही दखल घेतली नसल्याने अखेर या विषयी 16 जुलै 2021 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोर्टल वर ईमेल पाठवला, मात्र पंतप्रधान कार्यालयाने तातडीने दखल घेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला निर्देश देत याची तातडीने अमलबजावणसाठी करण्यास सांगितले. त्यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याला निर्देश देत ते धोकादायक माड त्वरित हटवण्याचे आदेश दिले. त्याची तातडीने अमलबजावणी करीत ते धोकादायक माड गेल्या आठवडय़ात हटविण्यात आले त्याबद्दल संजय राऊत यांनी आपल्या सारख्या एका सामान्य नागरिकाच्या तक्रारीची दखल घेतल्या बद्दल पंतप्रधान कार्यालयाचे विशेष आभार मानले आहेत. तसेच गोवा सरकारने याचां आदर्श घाव्या असे म्हटले आहे. दरम्यान संजय राऊत यांच्या या कामगिरी बद्दल जीवनदायिनी, पेडणे तर्फे अभिनंदन केले आहे.