ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या आश्वासनानंतर निर्णय
प्रतिनिधी / कोल्हापूर
महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाने येथील ऐतिहासिक बिंदू चौकात 1 जानेवारीला सुरू केलेले धरणे आंदोलन शनिवारी स्थागित करण्याचा निर्णय घेतला. महासंघाच्या मागण्यांबाबत राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेणार असून येत्या 18 जानेवारीला या संदर्भात मुंबईत बैठक होणार असल्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हा बँकेत झालेल्या चर्चेदरम्यान, स्पष्ट केल्याने गेले आठ दिवस सुरू असलेले बेमुदत धरणे आंदोलन स्थागित केल्याची माहिती सरचिटणीस कॉ. नामदेव चव्हाण यांनी दिली.
महासंघाच्या पदाधिकाऱयांनी शनिवारी दुपारी मंत्री मुश्रीफ यांची जिल्हा बँकेत भेट घेऊन त्यांना पुन्हा मागण्यांचे निवेदन दिले. त्यांच्याबरोबर चर्चाही केली. यावेळी प्राधान्यक्रमाच्या पाच मागण्यांच्या संदर्भात येत्या 18 जानेवारीला बैठकीत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन मंत्री मुश्रीफ यांनी दिले. ते म्हणाले, महासंघाच्या आंदोलनाची दखल घेत गेल्या आठ दिवसांत चार बैठक घेतल्या. त्यातील दोन बैठकांना मी स्वतः हजर होतो. लेखी स्वरूपात तीन शासकीय पत्रे देवून 18 जानेवारीला मुंबईत बैठक आयोजित केली आहे. या मागण्यांबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे. त्यामुळे महासंघाने त्यावर विश्वास ठेवावा आणि आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन मंत्री मुश्रीफ यांनी केले. आवाहनाला प्रतिसाद देत आंदोलन स्थागित करण्यात येत असल्याचे कॉ. नामदेव चव्हाण जाहीर केले.
चर्चेवेळी प्रा. तानाजी ठेंबरे, कॉ. बबन पाटील, कॉ. मंगेश म्हात्रे, कॉ. ऍड. राहुल जाधव उपस्थित होत. धरणे आंदोलनात कॉ. दिलीप पवार, कॉ. सदाशिव निकम, कॉ. सतिश्चंद्र कांबळे, कॉ. अनिल चव्हाण, कॉ. नामदेव गावडे, कॉ. मल्हार पाटील, कॉ. रघुनाथ कांबळे, कॉ. सम्राट मोरे, कॉ. शिवाजी पाटील, संतोष जाधव, प्रशांत आंबी, दिनेश चौगले, दीपक कांबळे, रोहित भंडारी, भिकाजी कुंभार, आनंदराव सोहनी, विशाल कांबळे, भरत साळोखे, बी. एल. बरगे आदींसह विविध जिल्हय़ातील महासंघाच्या पदाधिकाऱयांचा सहभाग होता.
महासंघाकडून मुश्रीफ यांचे अभिनंदन
जिल्हा बँकेतील विजयानंतर मंत्री मुश्रीफ यांचे विविध ठिकाणी सत्काराचे कार्यक्रम होते. तरीही त्यांनी महासंघाच्या प्रश्नांसंदर्भात वेळ देत चर्चा केली. त्याबद्दल आणि त्यांच्या विजयाबद्दल महासंघाच्या वतीने मुश्रीफ यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.