प्रतिनिधी / पणजी
आगामी निवडणुकीत भाजप घराणेशाहीला थारा देणार नाही, असे स्पष्ट निवेदन प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी केले. भाजपची ही भूमिका आहे व ते पक्षाचे धोरण असून त्यात कोणताही बदल होणार नाही, अशी भूमिका मांडल्याने अनेक विद्यमान आमदार अडचणीत येणार आहेत.
दैनिक तरुण भारतला दिलेल्या खास मुलाखतीत सदानंद शेट तानावडे यांनी मुदतपूर्व निवडणुकांची शक्यता फेटाळून लावली. जिल्हा पंचायत निवडणुकीचे श्रेय आपणही घेत नाही, वा मुख्यमंत्रीही घेत नाहीत. या यशाचे श्रेय हे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना जाते, असे त्यांनी सांगितले. प्रत्येक निवडणुकीला आम्ही गांभीर्याने घेत असतो. जिल्हा पंचायत निवडणुकीपूर्वी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पुष्कळ काम केलेले आहे. आता देखील आमच्या बैठका, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन आदी उपक्रम चालूच आहेत, अस ते म्हणाले.
जनता विरोधी पक्षांबरोबर नाही
आगामी पालिका निवडणुकांची प्रभाग रचना निश्चित झाल्यानंतर ती जाहीर होईल. त्यानंतर तीन आठवडय़ानंतर निवडणुका जाहीर होतील. 11 पालिका आणि एक महापलिका अशा या निवडणुका होतील. त्यातही भाजपच बाजी मारणार आहे. विरोधी पक्षाबरोबर जनता नाही. कारण हे पक्ष जनतेसाठी काहीही काम करीत नाहीत.
मुदतपूर्व निवडणुकीला जाणार नाहीत
आगामी पालिका निवडणुकीत उर्वरित 20 टक्के मतदार हे मतदान करतील. जिल्हा पंचायत निवडणुकीत राज्यातील 80 टक्के ग्रामीण भागातील जनतेने मतदान केलेले आहे. आता उर्वरित 20 टक्के मतदार हे आपले नगरसेवक निवडतील. या निवडणुकीतही भाजप अभूतपूर्व यश प्राप्त करील, मात्र त्यामुळे आम्ही मुदतपूर्व निवडणुकीला जाणार नाहीत, असे तानावडे म्हणाले.
एका घरात दोन तिकिटे नाहीच
एका महत्वपूर्ण प्रश्नाला उत्तर देताना तानावडे यांनी एका घरात दोन उमेदवारी दिली जाणार नाही, असे स्पष्ट केले. पक्षाने आजवर घराणेशाहीला कधीच प्रोत्साहन दिले नाही व देणारही नाही. पक्षाचे जे आजवरचे धोरण होते त्या धोरणाला फाटा मिळणार नाही. एखादे अपवादात्मक प्रकरण असू शकते. त्याला घराणेशाही म्हणणार नाही, तर एका घरात दोन आमदार व ते आता मागाहून भाजपमध्ये आलेले असतील, तर पक्ष अशा प्रकरणी विचार करील. परंतु सध्या आमदार आहेत व ते जर आपल्या निकटच्या नातेवाईकासाठी आणखी एखादी उमेदवारी मागत असतील तर अशाना आम्ही प्रोत्साहन देऊ शकत नाही. कारण आम्ही आजवर घराणेशाहीला कुठेही प्रोत्साहन दिलेले नाही.
नाईक, मांद्रेकर यांची स्वतःची वेगळी स्थाने
केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांचे चिरंजीव सिद्धेश नाईक यांना देखील विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दिलेली नाही. आता जिल्हा पंचायत निवडणुकीत सिद्धेश नाईक तसेच शिवोलीमध्ये मांद्रेकर यांना उमेदवारी दिलेली असली तरी त्यांना आमच्या नेत्यांची मुले म्हणून उमेदवारी दिलेली नाही तर त्यांनी पक्षासाठी काम करून आपापल्या मतदारसंघात स्वत:चे वेगळेस्थान निर्माण करून ठेवलेले आहे.
या नेत्यांच्या वाढणार अडचणी
दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्षानी घराणेशाहीचा मुद्दा खोडून काढल्याने व पक्षाच्या धोरणात कोणताही बदल होणार नसल्याने अनेक राजकीय नेत्यांच्या अडचणी वाढतील. आगामी निवडणुकीत पर्येमध्ये आरोग्यमंत्री विश्वजित राणे हे आपल्या पत्नीला निवडणुकीत उतरवू पाहत आहेत. उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर हे आपली पत्नी सावित्री कवळेकर यांना सांगे मतदारसंघात उतरवू पहात आहेत. बाबूश मोन्सेरात हे पणजीत तर त्यांची पत्नी जेनिफर या सध्या मंत्री आहेत. त्या ताळगावात तर त्यांचा मुलगा सांताक्रूझमध्ये उतरण्याच्या विचारात आहे. रवी नाईक हे सध्या काँग्रेसमध्ये असले तरी त्यांचे दोन्ही पुत्र भाजपमध्ये गेलेत. त्यातील एकाला फोंडय़ातून तर दुसऱयाला मडकईतून उमेदवारी हवी आहे. मंत्री मायकल लोबो हे कळंगूट मधून तर त्यांची पत्नी, ज्या सध्या सरपंच आहेत त्या श्रीमती डिलायला लोबो या साळगावमधून निवडणूक लढवू इच्छीत आहेत. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचे चिरंजीव सिद्धेश हे सध्या जि. पं. वर निवडून आलेले आहेत. त्यांना कुंभारजुवेतून निवडणूक लढवायची आहे. या सर्व नेत्यांसमोर पुन्हा एकदा अडचणी निर्माण होतील.